गेल्यावर्षी राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर २२ मार्चपासून देशभरात लॉकडाऊनला प्रारंभ झाला. जिल्ह्यांच्या सीमाच बंद करण्यात आल्या. त्याचबरोबर दोन महिने नागरिक पूर्णपणे घरातच बसून होते. वाहतूक थांबली, सामाजिक, धार्मिक सर्वच कार्यक्रमांवर बंदी आणल्यामुळे व्यक्ती मोठ्या प्रमाणावर एकत्र येणे थांबले. गेल्यावर्षीही कोरोनाची सुरुवात झाली त्यावेळी होळीला सुरुवात झाली होती. मात्र कोरोनाचे संकट लक्षात घेऊन धार्मिक कार्यक्रमांवर बंदी आणल्याने तसेच संचारबंदी असल्याने सर्वच धार्मिक विधी रद्द करण्यात आले होते. त्यामुळे एप्रिल महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात होता. एप्रिल अखेरपर्यंत कडक संचारबंदी लागू करण्यात आली. मात्र मे महिन्यात लॉकडाऊन काहीअंशी शिथील करण्यात आले. त्यांनतर कोरोनाचे रुग्ण अधिक प्रमाणात वाढत असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नंतर हळूहळू ऑक्टोबरपासून डिसेंबरपर्यंत रुग्णसंख्या आणि मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याने जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला होता. मात्र जानेवारीपासून पुन्हा लोकांच्या बेफिकिरीमुळे रुग्णसंख्या वाढू लागली आहे.
आता होळीचा सण जवळ आल्याने परराज्यात गेलेले मजूर मोठ्या प्रमाणावर गावाला येत असून अजून काही मजूर येणार हे निश्चित आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढणार हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाला अधिक सतर्क व्हावे लागणार आहे. गेल्यावर्षीसारखे पुन्हा आता जिल्ह्याच्या सीमेवर तपासणी यंत्रणा राबवावी लागणार आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला आता अधिक सतर्क व्हावे लागणार आहे.
तपासणी नाके सतर्क व्हावे
परराज्यात पोटाची खळगी भरण्यासाठी गेलेले मजूर मोठ्या संख्येने होळी सणासोबतच इतर सण-उत्सव साजरा करण्यासाठी दाखल होत आहेत. यासाठी प्रशासनाने सतर्क होऊन कोरोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणावर होऊ नये यासाठी तपासणी नाके सतर्क करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.