नंदूरबार : कापूस विक्रेत्या शेतकऱ्यांचे ३० लाख रुपये बुडविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत शहर पोलिसात लेखी फिर्याददेखील देण्यात आली आहे.
नंदूरबारमधील माळीवाडा भागातील शेतकऱ्यांनी नंदूरबारातील शेख आवेश शेख निसार पिंजारी व जुबेर अब्बास खाटीक या दोन व्यापाऱ्यांना कापूस विकला होता. त्या कापसाचे तब्बल ३० लाख ८१ हजार रुपये झाले होते. यातील एका व्यापाऱ्याचे निधन झाले आहे. त्यामुळे ही रक्कम थकली आहे. याबाबत दुसरा व्यापारी उडावाउडवीची उत्तरे देत आहेत.
यात शेतकऱ्यांची फसवणूक झाली असून न्याय मिळवून द्यावा व फिर्याद दाखल करावी, अशी मागणी शिवदास माळी, मनोज माळी, सारिका माळी, हेमंत महाजन, रघुनाथ माळी, वासुदेव माळी, गोपाळ माळी, किशोर माळी, सुरेश घाटे, राजेंद्र माळी, हितेश परदेशी, भाऊराव माळी, रमेश महाजन यांनी शहर पोलिसात दिलेल्या लेखी फिर्यादीत केली आहे.