शहादा तालुक्यातील गोमाई नदी पुनरुज्जीवन करण्याबाबत मागणीचे निवेदन भाजपच्या वतीने डॉ.किशोर पाटील, दिनेश खंडेलवाल, अतुल जयस्वाल, माधव पाटील आदींनी ७ मार्च २०१७ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांना दिले होते. उन्हाळाच्या सुरुवातीलाच शहादा तालुक्यातील पाणीटंचाई अनेक ठिकाणी जाणवत आहे. यात गोमाई नदीवर मध्य प्रदेश सिमेत मोठा बंधारा बांधला गेल्याने हे पाणी मध्य प्रदेशातच अडविले गेले आहे. त्यामुळे गोमाई नदीचे महाराष्ट्रातील पात्र हे कोरडेच आहे. याचा फटका शेतकरी, शेतमजूर व जनावरांना बसला आहे. भविष्यात नदीलगतच्या गावांना प्रचंड पाणीटंचाई निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. म्हणून गोमाई नदीवर काही ठिकाणी लहान-मोठे बंधारे बांधून नदी पुनरुज्जीवित करण्याचे अत्यंत गरजेचे आहे, असे निवेदनात म्हटले होते. त्यानुसार तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी शहाद्याचे तत्कालीन प्रांताधिकारी साताळकर यांना गोमाई नदीविषयी अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले होते. मागणीनुसार गोमाई नदीवरील साखळी बंधारे मंजूर करण्यात आले आहेत. त्यांच्या कामाचा शुभारंभ आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आला.
नदीचे पाणी वाहून जाऊ नये व शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता व्हावी म्हणून या भागातील गोगापूर, दामळदा, कवळीथ, भोरटेक, ओझर्टा, श्रीखेड या परिसरातील गोमाई नदीसोबत उमरी व खापरी नदीवरदेखील बंधारे बांधण्याची मागणी करण्यात आली होती. या साखळी बंधाऱ्यांचा फायदा शेतकऱ्यांना निश्चितच होणार आहे. बंधाऱ्याचे काम सुरू झाले असून येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना या बंधाऱ्यात साठणाऱ्या पाण्यामुळे पाण्याची उपलब्धता होणार आहे.
मार्च २०१७ मध्ये आम्ही निवेदन सादर केले होते. आज आम्हाला मनस्वी आनंद होतो की आमच्या मागणीनुसार गोमाई नदीवरील साखळी बंधारे मंजूर होऊन आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ होऊन ही कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. या धरणांचा परिसरातील शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होणार आहे.
-डॉ. किशोर पाटील, प्रदेश सदस्य, किसान मोर्चा