जिल्ह्यात उद्यापासून पुन्हा थंडीची लाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 12:35 PM2021-01-20T12:35:09+5:302021-01-20T12:35:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात वातावरण पुन्हा कोरडे होऊन दि. २१ जानेवारीपासून किमान तापमानामध्ये घसरण होऊ शकते, असा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात वातावरण पुन्हा कोरडे होऊन दि. २१ जानेवारीपासून किमान तापमानामध्ये घसरण होऊ शकते, असा अंदाज जिल्हा कृषी हवामान केंद्र, डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार यांनी वर्तविला आहे.
जिल्ह्याच्या काही भागात उद्या, गुरुवारपासून हा फरक जाणवू शकेल. जिल्ह्यातील किमान तापमान सध्या चढे जाणवत आहे. येत्या दोन दिवसांमध्ये हा पारा पुन्हा किंचित खाली जाऊन थंडीच्या पुढच्या टप्प्याचा अनुभव मिळू शकेल. कृषी विज्ञान केंद्रातील कृषी हवामान शास्त्रज्ञ सचिन फड यांनी दिलेल्या माहितीनुसार, २० जानेवारीपासून उत्तर मध्य महाराष्ट्र, संलग्न मराठवाडा, विदर्भ, उत्तर कोकणामध्ये थंडीची जाणीव होईल. जिल्ह्याच्या किमान तापमानाचा पारा येत्या २४ तासांमध्ये १३, तर त्यानंतरच्या २४ तासांमध्ये १२ अंशांपर्यंत खाली उतरेल, अशी शक्यता आहे. त्यानंतर किमान तापमानात वाढ होईल.
कच्छमध्ये १९ आणि २० जानेवारीला शीतलहरीची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. याचा परिणाम उत्तर महाराष्ट्रामध्ये जाणवू शकेल. शेतकऱ्यांनी थंडीपासून संरक्षणासाठी पिकास पाणी द्यावे, जेणेकरून जमिनीचे तापमान नियंत्रित राहील. केळी आणि पपईच्या फळास प्लास्टिक बॅगचे आवरण लावावे. थंड वाऱ्यापासून जनावरांचे, कोंबड्यांचे संरक्षण करावे.