ग्रामीण भागात बसेस सुरू करण्याची मागणी
नंदुरबार : तालुक्यातील धानोरा मार्गावर बसेस सोडण्याची मागणी करण्यात येत आहे. या मार्गातील गावांमध्ये बस जात नसल्याने नागरिक खासगी वाहनातून प्रवास करत आहेत. या वाहनांमध्ये जागा नसल्याने गाडीमागे लटकून प्रवास होत असल्याचे दिसून येत आहे.
पालिकेने तपासणी करण्याची गरज
नंदुरबार : शहरात अनलाॅकमुळे विवाह सोहळे तसेच घरगुती समारंभ मर्यादित नातेवाईकांच्या उपस्थितीत पुन्हा होत आहेत. यातून काही ठिकाणी अद्यापही वर्दळ वाढली आहे. दरम्यान, यासाठी गल्लोगल्ली तसेच रस्त्यांवर मंडप टाकण्यात येत आहेत. टाकलेल्या पेंडाॅलसाठी नागरिकांकडून परवानगी घेतली किंवा कसे हे पालिकेने तपासण्याची गरज आहे. तीन ते चार दिवस राहणाऱ्या पेंडाॅलमुळे वाहतुकीस अडथळा होत आहे.
शनिवारी कोथिंबीरचे दर पुन्हा घसरले
नंदुरबार : बाजारपेठेत शनिवारी कोथिंबीरीचे दर घसरल्याचे दिसून आले होते. यातून १० रुपयात कोथिंबीरीच्या तीन जुड्या देण्याची तयारी किरकोळ विक्रेते दर्शवत होते. बाजारात गेल्या काही दिवसांपासून कोथिंबीरीची मुबलक आवक होत असल्याने दर घसरत आहे.
दुर्गम भागात दमदार पावसाची प्रतीक्षा
धडगाव : तालुक्यातील विविध भागात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. यातून शेतकरी बियाणे पेरणीसाठी खोळंबले आहेत. जमिनीची वाफ होण्याएवढा पाऊस झालेला नसल्याने पेरण्यांना अद्यापही सुरुवात झालेली नसल्याची माहिती दिली गेली आहे.
सराफ बाजारात ग्रामीण भागातून गर्दी
नंदुरबार : खरीप हंगाम सुरू झाला असल्याने शेतशिवारात पेरणीसाठी लागणारे विविध साहित्य खरेदी करण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. चालू वर्षातील रब्बी हंगामासह गतवर्षीच्या खरीप हंगामात पीक येऊनही त्याची योग्य पद्धतीने विक्री न झाल्याने शेतकरी आर्थिक चणचणीत आहेत. यातून साहित्य खरेदीसाठी सोने व चांदीचे दागिने गहाण ठेवत वेळ भागवण्याची तयारी त्यांच्याकडून ठेवली जात आहे.
नाशिक मार्गावरील बसेसमध्ये गर्दी कमी
नंदुरबार : शहरातून नाशिकसाठी दिवसभरात १४ पेक्षा अधिक फेऱ्या सध्या होत आहेत. साक्री-पिंपळनेर मार्गाने ह्या फेऱ्या होत आहेत. परंतु प्रवासी ह्या फेऱ्यांना पसंती देत नसल्याचे चित्र आहे. पिंपळनेर ते सटाणा दरम्यान रस्ता खराब असल्याने गर्दी कमी होत आहे.
ग्रामीण हद्दीतील नागरिकांचे हाल
नंदुरबार : शहर व परिसरात दमदार पाऊस झालेला नाही. रिमझिम पाऊस सुरू आहे. यातूनही ग्रामीण हद्दीतील रस्ते चिखलमय होत असल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांचे आतापासूनच हाल सुरू झाले असल्याचे चित्र सातत्याने समोर येत आहे.
लाॅकडाऊनच्या निर्णयाने चिंता
नंदुरबार : जिल्ह्यात सायंकाळी चारपर्यंत व्यवहार सुरू ठेवण्याचे आदेश दिल्याने रस्त्यालगत विविध व्यवसाय करणारे व्यावसायिक चिंतेत आहेत. वेळेआधीच व्यवसाय आटोपावा लागणार असल्याने रोजगारावर परिणाम होणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
मोड परिसरात बिबट्याचा संचार
बोरद : तळोदा तालुक्यातील मोड, मोहिदा व कळमसरे परिसरात बिबट्याचा संचार असल्याचे सांगण्यात आले आहे. सायंकाळी बिबट्या दिसून येत असल्याचे शेतकरी व मजूर सांगत आहेत. वनविभागाने याकडे लक्ष द्यावे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.