वाट चुकून नागरी वस्तीत आलेल्या ‘चितळ’ला पुन्हा सोडले वनक्षेत्रात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 09:52 PM2020-08-13T21:52:24+5:302020-08-13T21:52:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील हरीओम नगरात वनक्षेत्रातून चुकून आलेल्या चितळला वनविभागाच्या पथकाने यशस्वीरित्या रेस्क्यू करुन पुन्हा वनक्षेत्रात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील हरीओम नगरात वनक्षेत्रातून चुकून आलेल्या चितळला वनविभागाच्या पथकाने यशस्वीरित्या रेस्क्यू करुन पुन्हा वनक्षेत्रात सोडून दिले आहे़ बुधवारी पहाटेच्या सुमारास चितळ एका घराच्या कंपाउंडमध्ये शिरले होते़
नंदुरबार शहरालगत वनक्षेत्रात तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढत आहे़ यातून चितळ, काळबीट आणि नीलगाय हे हरीणवर्गीय प्राणी संचार करु लागले आहेत़ कळपात फिरणारे हे वन्यजीव रात्रीच्यावेळी निर्जन शांतता असल्याने वनक्षेत्राबाहेर अन्नाच्या शोधात येत आहेत़ यातून बऱ्याच वेळ ही जनावरे नागरी वसाहतीत शिरत असल्याचे प्रकार घडत आहेत़ बुधवारी पहाटे वाट चुकलेले चितळ एका घराच्या ओसरीत फिरत असल्याचे नागरिकांना दिसून आले होते़ त्यांनी तातडीने वनविभागाला याची माहिती दिली होती़ सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी तातडीने पथक पाठवून कार्यवाही करण्याची सूचना केली होती़ पथकाने अत्यंत सावधपणे चितळ पकडून त्याला वनविभागाच्या कार्यालयात आणून वैद्यकीय तपासणी करुन घेतली होती़ ताब्यात घेतलेल्या चितळाला सकाळी पथकाने शहरानजीकच्या वनक्षेत्रात सोडून दिले आहे़ यापूर्वी वनविभागाने एक काळवीट आणि एक निलगाय यांचे रेस्क्यू करुन मार्ग दाखवला होता़ ही कारवाई सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांच्या मार्गदर्शनात वनक्षेत्रपाल एमक़े़ रघुवंशी, वनपाल नांदरखे, संजय पाटील, वनपाल युवराज भाबड, विशाल मराठे, हिम्मत चौरे, आवशा सूर्यवंशी यांनी केली़
वनविभागाकडून नंदुरबार तालुका आणि परिसरातील वनक्षेत्रात सातत्याने वृक्षलागवडीसह वृक्षतोड आणि कुरण चराईस बंदी करण्यात येत आहे़ यातून वनक्षेत्रात वन्य प्राण्यांचा अधिवास वाढण्यास मदत होत आहे़ स्थानिक वनव्यवस्थापन समित्याही वनविभागासोबत कामकाज करत असल्याची माहिती आहे़