सातपुड्याच्या दुर्गम भागाला अखेर मंत्रीमंडळात मिळाले प्रतिनिधीत्व!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 12:22 IST2019-12-31T12:22:19+5:302019-12-31T12:22:25+5:30

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : १९६७ पासून सतत मंत्रीपद मिळणाऱ्या नंदुरबारला पाच वर्षाच्या खंडानंतर पुन्हा मंत्रीपद ...

Cabinet has finally got representation in the remote parts of Satpuda! | सातपुड्याच्या दुर्गम भागाला अखेर मंत्रीमंडळात मिळाले प्रतिनिधीत्व!

सातपुड्याच्या दुर्गम भागाला अखेर मंत्रीमंडळात मिळाले प्रतिनिधीत्व!

मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : १९६७ पासून सतत मंत्रीपद मिळणाऱ्या नंदुरबारला पाच वर्षाच्या खंडानंतर पुन्हा मंत्रीपद मिळाले आहे. यावेळी सातपुड्याच्या दुर्गम भागाचे प्रतिनिधीत्व करणाºया आमदारांना प्रथमच संधी देण्यात आली आहे. आमदार अ‍ॅड.के.सी.पाडवी या काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते आणि सतत सात वेळा निवडून आलेल्या लोकप्रतिनिला कॅबीनेट मंत्रीपद मिळाल्याने जिल्ह्याला न्याय मिळाला आहे.
संयुक्त धुळे जिल्हा असतांना नंदुरबार विभागाला नेहमीच मंत्रीपद मिळाले आहे. थेट डी.एन.पाडवी यांच्यापासून आतापर्यंत अ‍ॅड.के.सी.पाडवी यांचा समावेश करता येईल. या नेत्यांनी आपल्या परीने परिसराच्या विकासाला चालना दिली आहे.
सतत मंत्रीपदाचा मान
नंदुरबार विभागाला सतत अर्थात १९६७ पासून उपमंत्री, राज्यमंत्री ते कॅबीनेट मंत्रीपदाचा मान मिळत गेला आहे. तळोदा मतदार संघातून निवडून गेलेले डी.एन.पाडवी यांना तेंव्हाच्या सरकारमध्ये उपमंत्रीपदाचा मान मिळाला होता. त्यानंतर दिलवरसिंग पाडवी यांना राज्यमंत्रीपद मिळाले. काँग्रेसच्या काळात नंदुरबार मतदारसंघातून निवडून आलेले आर.पी.वळवी यांना काही काळ राज्यमंत्रीपद मिळाले. त्यानंतरच्या काळात मात्र सातत्याने जिल्ह्याला नवापूर मतदार संघातून कॅबीनेट मंत्रीपद मिळत गेले ते सुरूपिसंग नाईक यांच्या रुपाने. सतत २० वर्ष ते कॅबीनेट मंत्री म्हणून राहिले. त्यानंतर १९९५ मध्ये नंदुरबारातून निवडून आलेले आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी युतीच्या काळात पाच वर्ष राज्यमंत्रीपद मिळविले. नंतर आघाडीच्या तीन सरकारांमध्ये ते कॅबीनेटमंत्री राहिले.
आघाडीच्या सत्तेच्या काळात अर्थात १९९९ ते २०१४ पर्यंत जिल्ह्याला दोन कॅबीनेट मंत्री मिळत होते. २०१४ मध्ये सत्तांतर झाले. केंद्रीय राजकारणात भाजपने मुसंडी मारली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची क्रेझ निर्माण झाल्यानंतर अनेकांनी पक्षांतर केले. त्यात आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनीही आघाडीच्या सरकारमधून मंत्रीपदाचा राजीनामा देत कन्येला भाजपमध्ये प्रवेश देत कन्या डॉ.हिना गावीत यांना लोकसभेत निवडून आणले. विधानसभेत ते स्वत: भाजपकडून निवडून आले. परंतू तेंव्हापासून अर्थात गेल्या पंचवार्षीकमध्ये भाजप सत्तेच्या काळात नंदुरबार मंत्रीपदापासून उपेक्षीत राहिले.
पाच वर्ष उपेक्षाच
भाजपच्या गेल्या पाच वर्षाच्या सत्ता काळात जिल्ह्याला मंत्रीपद मिळू शकले नाही. जिल्ह्यातून भाजपचे आमदार डॉ.विजयकुमार गावीत व उदेसिंग पाडवी हे दोन आमदार निवडून गेले होते. दरवेळी मंत्री मंडळाच्या विस्तारावेळी जिल्ह्याला मंत्रीपद मिळेल म्हणून चर्चा होत होती. परंतु पुर्ण पाच वर्ष जिल्हा मंत्रीपदाविनाच राहिला.
दुर्गम भागाला न्याय
सतत सात वेळा निवडून येण्याचा मान मिळविणारे आमदार अ‍ॅड.के.सी.पाडवी यांना यावेळी काँग्रेसने मंत्रीपदाचा मान दिला. ते निवडून येत असलेला मतदारसंघ अर्थात अक्कलकुवा व धडगाव तालुका पुर्ण डोंगराळ, दुर्गम व अविकसीत आहे. त्यामुळे एका अर्थाने अ‍ॅड.पाडवी यांच्या माध्यमातून दुर्गम भागाला मंत्रीमंडळात प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे.

काँग्रेस पक्षात आजच्या परिस्थितीत ज्येष्ठ नेत्यांमध्ये आमदार अ‍ॅड.के.सी.पाडवी यांचा समावेश होतो. यावेळी त्यांना उमेदवार निवडीच्या कोअर कमिटीत स्थान होते. महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेच्या चर्चांमधील प्रमुख नेत्यांमध्ये देखील आमदार अ‍ॅड.पाडवी यांचा समावेश होता. मंत्रीमंडळ विस्तारात त्यांचे नाव काँग्रेसतर्फे सतत वरच्या क्रमांकावरच घेतले जात होते.

Web Title: Cabinet has finally got representation in the remote parts of Satpuda!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.