रक्तसाठा अवघा चार दिवसांचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 12:34 PM2020-03-28T12:34:32+5:302020-03-28T12:34:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रक्तदानाला देखील ब्रेक मिळाला आहे. यामुळे जिल्हा रुग्णालय आणि खाजगी रक्तपेढीत १ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रक्तदानाला देखील ब्रेक मिळाला आहे. यामुळे जिल्हा रुग्णालय आणि खाजगी रक्तपेढीत १ एप्रिलपर्यंत पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक आहे. सुदैवाने सध्या अपघातातील जखमी व नियमित शस्त्रक्रियेसाठी रक्ताची मागणी कमी असल्यामुळे तुटवडा जाणवत नसला तरी येत्या काळात बिकट परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदानासाठी पुढे यावे. शिबिर घेवू नये असे आवाहन करण्यात येत आहे.
कोरोनाच्या संसर्गाच्या भितीमुळे सध्या रक्तदानाचे प्रमाण मंदावले आहे. गेल्या १० दिवसात तर कुणीही रक्तदानासाठी फिरकले नसल्याची स्थिती आहे. यामुळे नंदुरबारातील सिव्हील मधील रक्तपेढी आणि जनकल्यान या खाजगी रक्तपेढीत रक्तसाठा मर्यादीत आहे. दिवसेंदिवस हा साठा कमी होऊ लागला आहे. त्यामुळे येत्या काळात आणखी बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
कोरोना व रक्तदान
कोरोना व रक्तदान यांचा परस्पर काहीही संबध नाही. प्राथमिक तपासणी करून कुणालाही रक्तदान करता येणार आहे. कोरोनाचा संसर्ग रक्तदान करतांना होऊ शकतो हा समज चुकीचा आहे. जिल्हा रुग्णालय आणि खाजगी रक्तपेढीत रक्तदानासाठी वेगळा कक्ष आहे. त्यामुळे कोरोनाला घाबरून रक्तदान न करणे ही बाब चुकीची आहे. नागरिकांनी स्वत:हून रक्तदानासाठी पुढे येणे आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
चार ते पाच दिवस पुरेल
सध्या असलेला शिल्लक रक्तसाठा लक्षात घेता तो एप्रिलच्या १ तारखेपर्यंत किंवा पहिल्या आठवड्यापर्यंत पुरण्याची शक्यता आहे. रक्तदानासाठी अशीच स्थिती राहिली तर पुढील काळात बिकट स्थिती राहणार आहे. जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीत सध्या १६० बॅग रक्त उपलब्ध असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आर.डी.भोये यांनी सांगितले तर खाजगी जनकल्यान रक्तपेढीत १ एप्रिलपर्यंत पुरेल इतका साठा आहे. त्यातही ओ पॉझिटीव्ह वगळता इतर गटाचा साठा कमी असल्याचे समन्वयक डॉ.अर्जून लालचंदाणी यांनी स्पष्ट केले.
शिबिर नको, वैयक्तीक या...
सध्या कोरोनामुळे एकाच ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे रक्तदान शिबिर आयोजीत करण्याऐजी इच्छूकांनी दोन ते तीनच्या संख्येने रक्तपेढींमध्ये येवून रक्तदान करावे असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
दोन्ही ठिकाणी वेगळे कक्ष आहे. तेथे निर्जूंतूकीकरणासह इतर सर्व उपाययोजना केलेल्या असतात. त्यामुळे कोरोनाबाबत कुणीही भिती बाळगण्याचे कारण नाही असेही डॉ.आर.डी.भोये व डॉ.अर्जून लालचंदाणी यांनी स्पष्ट केले.