आषाढ महिना म्हटला म्हणजे ग्रामीण भागात विविध देवी-देवतांचे पूजन करून त्यांना नैवेद्य दाखवून इडा पिडा टळो म्हणत साकडे घातले जाते. श्रद्धा-अंधश्रद्धेचा हा भाग असला तरी ग्रामीणसह शहरी भागातदेखील ही परंपरा कायम आहे. नंदुरबारातदेखील तिन्ही दिशेला तीन ठिकाणच्या मंदिरावर अशा प्रकारचे नैवेद्य देण्यासाठी महिलांची गर्दी होते. शहरातील वाघेश्वरी चौफुलीच्या अलीकडे देवीचे मंदिर आहे. आषाढ महिन्याच्या दर मंगळवार आणि शुक्रवारी या ठिकाणी देवीला नैवेद्य देण्यासाठी मोठी गर्दी होते. अशीच गर्दी मंगळवारीदेखील झाली. पावसाची संततधार आणि महिलांची गर्दी त्यातच रांग लागलेली. मुख्य रस्त्यावरच हे मंदिर असल्याने ट्राफिकही जाम झाली. पुढे काही अंतरावर वर्दीतील पोलीस वाहनांना अडवून लायसन्स तपासणी, वाहनांची कागदपत्रे तपासणी करीत होते. परंतु येथील गर्दी आणि वाहतुकीची कोंडीकडे त्यांचे लक्षही नव्हते. आधीच शहरात वाहतुकीचे तीन तेरा झालेले आहेत. नागरिक कंटाळले आहेत. त्यातच कागदपत्र तपासणीच्या नावाखाली त्रास. यामुळे एका महिलेने संतापाच्या सुरात शहरातील वाहतुकीच्या समस्येचीही इडा पिडा टळो आणि वाहतूक सुरळीत होवो म्हणून उद्दगार काढले... ते ऐकून रांगेतील महिलांनाही हसू आवरता आले नाही...
-मनोज शेलार, नंदुरबार