विसरवाडी : नवापूर तालुक्यातील अंजने ते भांगरपाडा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून ठेकेदाराला याबाबत सूचना करूनही रस्ता कामात सुधारणा होत नसल्याने भांगरपाडा सरपंच जयंत पाडवी यांनी काम बंद पाडले आहे. कोरोना काळातील संचारबंदीचा लाभ उठवत ग्रामीण भागात रस्ता काम निकृष्ट होत असल्याचे सांगत त्यांनी हे काम बंद पाडले.
अंजने ते भांगरपाडा दरम्यान दोन किलोमीटर रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले होते. याबाबत त्यांनी भांगरपाडा सरपंच जयंत पाडवी व पंचायत समिती सदस्य यशोदा दिलू वळवी यांना याची माहिती दिली होती. त्यानुसार सरपंच पाडवी व पंचायत समिती सदस्य यशोदा वळवी यांनी रस्त्याच्या कामाची पाहणी करून संबंधित ठेकेदाराला काम चांगले करण्याची सूचना दिली. मात्र सूचना करूनही ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याने रस्त्याचे काम बंद पाडले आहे. ठेकेदाराकडून वापरण्यात आलेली खडी व डांबर सहज उकरले जात असल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले. यातून हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे सांगण्यात आले. कोरोना संकट काळात नागरिक घरी असताना विविध विकास कामे करणारे ठेकेदार हे निकृष्ट दर्जाची कामे करून पळ काढण्याच्या मागे आहेत. रस्त्याच्या कामाबाबत संबंधित अभियंता व येथील जिल्हा परिषद सदस्य यांंचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याची माहिती सरपंच पाडवी यांनी यावेळी दिली.