गेल्या दोन-तीन वर्षांपासून अवकाळी पाऊस, नैसर्गिक संकट, पावसावर अवलंबून असलेला शेती व्यवसाय संकटात सापडलेला आहे. अक्षय्य तृतीया सण जवळ आला की शेतकरी शेतीकामासाठी सालगडी म्हणून नोकरीस कोणाला ठेवावे याचा विचार करू लागतो व त्यानुसार सालगडी शोधत असतो. मागील वर्षी साल गड्याला वार्षीक रक्कम ३५ ते ५५ हजारांपर्यंत सहज दिले गेले होते. यावर्षी अवकाळी पाऊस कमी झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. आता आखाजीचा सण जवळ येऊन ठेपला आहे तरीही शेतकरी सालदार ठेवण्याची हिंमत दाखवत नसल्याचे चित्र दिसत आहे. सालगडी मिळत नसल्यामुळे काही शेतकरी बटाईने, भाडेतत्त्वावर शेती करण्याच्या मानसिकतेत आहेत. प्रथेप्रमाणे शेतकरी आखाजीच्या दोन-तीन दिवस अगोदरपासून सालगडी निवडतात पूर्वीचा सालगडी योग्य वाटल्यास त्याच्या वार्षिक रकमेत काही प्रमाणात वाढ करून त्यालाच पुन्हा ठेवले जाते. यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने विहीर व बोअरला काही ठिकाणी पाणी कमी झाले आहे, तर काही कोरड्या ठक्क झाल्या आहेत. त्यामुळे शेती उत्पन्न कमी निघाले आहे. परिणामी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत सालगडी वर्षाची अदाईगी ५० ते ७० हजार व चार पोते धान्य मागत आहे. दिवसभर शेतात काम करणार, पण रात्री शेतात मुक्कामी राहणार नाही, मालकांनी मोबाइलची सोय करून द्यावी, ठरलेल्या रकमेची निम्मी रक्कम उचल म्हणून सुरुवातीलाच द्यावी, अशा मागण्या सालगडी मांडत आहेत. शेती अवजारे खते बी-बियाणे यांचे दर वाढत आहे अशा परिस्थितीत मोठा बागायतदार किंवा मोठे शेतकरी यांनाही सालदार लावून घेण्याचे अडचणीचे ठरत आहे, तर अल्पभूधारक निम्मेबटाई किंवा पैशाने शेती देण्यावर भर देत असल्याचे दिसून येत आहे. काही शेतकरी यावर उपाय म्हणून हंगामी रखवालदार किंवा गडी निवडतात, त्यातही ज्यांना ट्रॅक्टर चालवीने येते त्यांना शेतकरी प्राध्यान्याने निवडले जाते.
यंदा असलेली लॉकडाऊन, संचारबंदी, कोरोना विषाणू प्रादुर्भाव आणि दुसरीकडे वाढत चाललेली महागाई यामुळे यंदा शेतीतून अत्यंत कमी उत्पादन निघाले आहे. निघालेल्या मालास बाजारपेठेत भाव मिळाला नाही. बँका कर्जवाटपात दिरंगाई करतात, काही गावांमध्ये काही शेतकऱ्यांना पीक विमा ही मिळाला नाही, त्यामुळे सालदाराचा पगार व चार पोती धान्य द्यावा कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
-अर्जुन चौधरी, शेतकरी, बामखेडा