होळी आणि गुढीपाडव्याची चाहूल लागली की साखरेच्या गाठ्यांचे रेडिमेड हार बाजारात आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. पण अनेक कुटुंबांमध्ये या गाठी निर्मितीचा व्यवसाय परंपरागतरित्या चालत आला आहे. अशा परंपरेतूनच शहादा तालुक्यातील तोरखेडा येथील छगन भोई गेल्या महिनाभरापासून आपल्या कुटुंबाबरोबर त्या तयार करण्याच्या कामाला लागले आहेत. या दिवसात मोठी मागणी असल्याने या कामाला महाशिवरात्रीपासूनच सुरुवात होते आणि साधारण गुढीपाडव्यापर्यंत या कामाची लगबग सुरू राहते. पांढऱ्या शुभ्र आणि तितक्याच चविष्ट गाठी तयार करण्यासाठी भोई कुटुंब परिसरात प्रसिद्ध आहे. वडिलोपार्जित नव्हे तर गेल्या चार पिढ्यांचा हा उद्योग त्यांनी आजही तितक्याच समर्थपणे यशस्वी करून दाखवला आहे.
वर्षातून केवळ एक महिनाच हे काम असले तरी मोठी मागणी असल्याने ते वेळेवर पार पडणे आवश्यक असते. या साखरगाठीची रेसेपी साधारण वाटत असली तरी यामागे मोठी मेहनत घ्यावी लागते. सर्व कुटुंब या दिवसात भल्या पहाटे उठून या कामाला लागतात, असे भोई यांनी सांगितले. सुरुवातीला एका कढईला उष्णता देऊन त्यात गरजेनुसार पाणी आणि साखर टाकली जाते. नंतर यात दूध टाकून ते अधिक शुभ्र आणि चवदार होईल याची काळजी घेतली जाते. मग याला चाचणी देऊन या साखरेचे पाणी एका लाकडी साच्यात दोरे टाकून भरले जाते. काही वेळाने ते थंड झाले की हे लाकडी साचे वेगळे काढले जातात मग यातून तयार होतो तो साखरेचा पांढरा शुभ्र हार.
ग्रामीण भागात परंपरेने चालत आलेला हा उद्योग आजच्या मार्केटिंगच्या काळातही धडपडत का होईना शाबूत असल्याने काही कुटुंबाना वर्षातून एका महिन्याचा चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे. मात्र आज मोठ्या व्यवसायाच्या स्पर्धेत ही परंपरा किती शाबूत राहील, हा एक प्रश्नच आहे. अनेक वर्षांच्या या पदार्थ परंपरेमुळे होळी आणि गुढीपाडव्याला आता अशा साखर गाठींना धार्मिक महत्त्व येत आहे. दिवाळीला लाडू, करंज्या आणि संक्रांतीला तिळगूळ याप्रमाणेच होळी व गुढीपाडव्याला या साखरगाठीचे मोठे महत्त्व असते.