लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील वाळू ठेके रखडले आहेत. यंदा तीन घाट निश्चित करण्यात आले. पैकी दोन घाटांचा लिलाव करण्यात आला. एकाचे पैसे भरून ते परत घेण्याची वेळ आली तर दुसरा घाटचा लिलाव झाला परंतु पैसेच भरले गेले नाहीत. तिसरा लिलाव कुणीच घेतला नाही. दरम्यान, जिल्ह्यातून गुजरातमधील वाळूची दररोज तब्बल दीडशे वाहने पास होत असल्याचे चित्र आहे. त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जात नाही.
जिल्ह्यात तापी, गोमाई, रंगावली या नदींमध्ये एकुण ३१ वाळू घाट आहेत. त्यातील अनेक घाट हे पर्यावरण मुल्यांकनात अडकले होते. तापीनदीवरील कुढावद तर्फे सारंगखेडा, कौठळ व टेंभा या गाव शिवारातील वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रीया करण्यात आली. त्यातील कौठळचा घाट हा दोन कोटी ९७ लाखात गेला. त्याचे पैसेही भरण्यात आले. परंतु घाटात पाणी असल्याचे कारण सांगून वाळू उपसा करण्यास परवाणगी देण्यात आली नाही, अखेर ठेकेदाराने पैसे परत घेतले. दुसरा टेंभा घाटाचा लिलाव तीन कोटीत झाला. परंतु ठेकेदाराने पैसेच भरले नाहीत. तिसऱ्या कुढावद घाटासाठी कुणीच निविदा भरली नाही.
दुसरीकडे जिल्ह्याच्या सिमेवरील गुजरातच्या हद्दीतून तापीमध्ये चार ते पाच ठेके आहेत. त्यातून लाखो ब्रास वाळू उपसा होत असून त्याची वाहतूक जिल्ह्यातून बिनधिक्कत सुरू आहे. दररोज किमान दीडशे वाहने जिल्ह्यातून नाशिक, मुंबई, औरंगाबाद या भागात जातात.
वाळू वाहतुकीच्या वाहनांमुळे गेल्या वर्षभरात १० ते पेक्षा अधीक अपघात झाले असून त्यात तीन जणांना जीव गमवावा लागला तर १५ पेक्षा अधीक जण जायबंदी झाले आहेत. प्रशासनाने वर्षभरात १७० वाहनांवर कारवाई करून लाखो रुपयांचा दंड वसुल केला आहे.
दरम्यान, खनिकर्म विभागाच्या उपजिल्हाधिकारी रोहिणी चव्हाण यांनी सांगितले, जिल्ह्यात तीन वाळू घाटांचा लिलाव प्रक्रीया राबविण्यात आली. परंतु तांत्रीक कारणांनी ते घाट सुरू होऊ शकले नसल्याचे स्पष्ट केले.