नंदुरबार : एप्रिल २०२० मध्ये जिल्ह्यात कोरोनाचा प्रथम रुग्ण आढळून आल्यानंतर कमी अधिक प्रमाणात संसर्ग बाधित रुग्ण समोर येण्याचे प्रमाण होते. परंतु मार्च २०२१ मध्ये रुग्ण वाढीच्या संख्येने हजारोंच्या संख्येत प्रवेश केल्याने चिंता वाढल्या होत्या. परंतु या चिंतांमध्ये दिलासा देणारी बाबही समोर आली असून गेल्या एक वर्षात तब्बल २४ हजार नागरीकांनी कोरोनाचा यशस्वीपणे सामना करत त्याचा पराभव करुन आरोग्य अबाधित राखले आहे.
या २४ हजार नागरिकांच्या अनुभवातूनच सध्या उपचार घेत असलेल्या अनेकांना आधार मिळत असल्याचेही दिसून येत आहे. फोफावणारा संसर्ग कमी व्हावा यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरु केले असले तरी त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे सकारात्मक विचार कामी येत आहेत. यातूनच अनेकांनी कोरोनावर मात करत घरचा रस्ता धरला आहे. सध्या जिल्ह्यात साडेसात हजार रुग्ण असले तरी गेल्या आठ दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याने रुग्ण संख्या घटत आहे. या पार्श्वभूमीवर येत्या काळात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊन बाधितांच्या संख्येवरही नियंत्रण शक्य होणार आहे.
जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी रेटही झाला कमी
जिल्ह्यात आजअखेरीस एकूण ६ हजार ९५७ रुग्ण आहेत. यातून जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी रेट हा २२ टक्के आहे. शंभरातील २२ नागरिकांना सध्या कोरोनाची लागण असू शकते असा याचा अर्थ असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. गेल्या १० दिवसात या आकडेवारीत ९ टक्क्यांची घट आली असल्याची माहिती आहे. येत्या काळात हा दर आणखी घसरणार असल्याचे खात्रीशीरपणे सांगण्यात येत आहे.
सीटीस्कॅनचा स्कोर हा सहा होता. यातून भीतीही बरीच होती. परंतु केवळ वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला आणि आहार यावर लक्ष केंद्रित केले. सकारात्मक विचार ठेवत दिनचर्या सुरू ठेवली. मनात भीतीही ठेवली नाही अन् मुक्त झालो.
-कोरोनामुक्त,
६९ वर्ष, शहादा.
ग्रामीण भागात कोरोनाबद्दल बरेच गैरसमज आहेत. दवाखान्यात जाऊच नये, असा सल्ला सर्वात प्रथम दिला गेला. परंतु योग्य उपचारांशिवाय कोणताही पर्याय नसल्याचे ठाऊक होते. त्यानुसार रुग्णालयात दाखल झालो.
-कोरोनामुक्त,
७२ वर्षीय पुरुष, घोटाणे, ता. नंदुरबार.
कोरोनामुक्त होणे ही खरी तर कसोटी आहे. सकारात्मक ऊर्जा आणि विचार यातून कोरोना बरा होऊ शकतो. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोनावर उपचार घेतले पाहिजेत. उपचार घेणे हाच एकमेव पर्याय यावर उपलब्ध आहे.
-कोरोनामुक्त,
६५ वर्षीय महिला,नंदुरबार.
कोरोनाची लागण झाली ही भीतीच रोग बळावण्याचे मुख्य कारण बनत आहे. पाॅझिटिव्ह असलेल्या या आजाराला पाॅझिटिव्ह राहून संपवणे, हीच मोठी उमेद आहे. जिल्हा रुग्णालयात आम्ही दररोज रुग्णांना यावर मार्गदर्शन करतो.
-डाॅ. के. डी. सातपुते,
अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक.