नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या महिनाभरात १,९१० जणांना ई-पास देण्यात आली तर जवळपास २१०० जणांना विविध कारणांनी पाससाठीचे अर्ज नामंजूर करण्यात आले. सर्वाधिक प्रवास हे सुरत व नाशिक येथे झाले. पास काढतांना वैद्यकीय उपचाराचे कारण देण्यात आले. दरम्यान, ई-पास नसल्याने कुणावर कारवाई झाल्याची माहिती मिळू शकली नाही.
१५ एप्रिलपासून राज्यात संपुर्ण संचारबंदी लागू झाल्यानंतर एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास आवश्यक करण्यात आली आहे. त्यासाठी ऑनलाईन माहिती भरून पास उपलब्ध केला जातो. नंदुरबार जिल्ह्यातून परजिल्ह्यात ई-पास घेऊन जाण्यासाठी चार हजार ३०० जणांनी ऑनलाईन प्रस्ताव टाकले होते. त्यापैकी १,९१०जणांचे मंजूर करण्यात आले. २१०० जणांचे प्रस्ताव नाकारण्यात आले.
नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांची वैद्यकीय उपचारासाठीची मुख्य धाव ही गुजरात राज्यातील सुरतसह राज्यातील नाशिक येथे आहे. याशिवाय शैक्षणिक, रोजगार आणि इतर कामांसाठी पुणे, मुंबई व औरंगाबाद आणि जळगावकडे जिल्ह्यातील नागरिकांची धाव राहिल्याचे चित्र होते.
जिल्ह्यात विना ई-पास येणाऱ्यांवर कारवाईची माहिती मात्र उपलब्ध होऊ शकली नाही.