नांदेड : आषाढी एकादशीची वारी म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक ऐक्य यांचा संगम. या परंपरेला नव्या पिढीचा सामाजिक आणि पर्यावरणपूरक स्पर्श देत, नांदेडमधील काही तरुण-तरुणींनी यंदा सायकलवरून पंढरपूर वारी करण्याचा संकल्प केला आहे. तब्बल ३२१ किलोमीटरचा प्रवास सायकलवरून करून विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी ही चमू गुरुवारी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे.
आषाढी एकादशी ६ जुलै रोजी असून विविध भागांतून पायी दिंड्या पंढरपूरसाठी मार्गस्थ झाल्या आहेत. या महिन्याच्या वारीमध्ये नांदेड जिल्ह्यातील हजारो वारकरी सहभागी होतात. नांदेडच्या विठ्ठल भक्तांकडून आरोग्य सेवा, अन्नदान आदी सेवा दिल्या जातात. दरम्यान, सायकलिस्ट ग्रुपच्या माध्यमातून १४ जण गुरुवारी पंढरपूरकडे मार्गस्थ झाले. विशेष म्हणजे यामध्ये चार तरुणींचा समावेश आहे. रॅली मार्गस्थ झाली त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राहुल कर्डिले, जि.प.चे लेखाधिकारी निळकंठ पाचंगे, कवी बापू दासरी आदींची प्रमुख उपस्थिती होती. या वारीचा मार्ग नांदेड ते लातूर, धाराशिव मार्गे पंढरपूर असा असणार आहे. वारीचे अंतिम स्वरूप २२ जून रोजी पंढरपूर नगरीत विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाने पूर्णत्वास जाईल. सकाळी ६:३० वाजता सामूहिक अभिषेक, आरती आणि दर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
हे आहेत सहभागी सायकलिस्टया रॅलीमध्ये नांदेड येथील सायकलपटू डॉ. देवेंद्र पालीवाल, डॉ. गणेश पावडे, गजेंद्र दरक, चेतन परमाणी, रोमीत मालवाणी, डॉ. मनीष दागडिया, अर्पित फलोर, डॉ. भावना भगत, सुकेशनी शिंदे, डॉ. ओम दमकोंडवार, युगा दासरी, सुधा टेकुळे, अभिजित ठारके यांचा समावेश आहे.
एक नवा विचार, एक नवा प्रवासभक्ती, आरोग्य आणि पर्यावरण या तिन्ही अंगांनी समृद्ध अशा या उपक्रमातून ‘वारी’चा नव्याने अर्थ लावण्याचा प्रयत्न सदर सायकलपटू करत आहेत. या सायकलवारीमागे ‘पर्यावरण वाचवा, आरोग्य जपा आणि परंपरेला नवा अर्थ द्या’ असा प्रदूषणमुक्त आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश दिला जात असल्याचे सायकलपटू डॉ. गणेश पावडे यांनी सांगितले.
असा होणार सायकलवारीचा प्रवास१९ जून रोजी नांदेड येथून निघालेली सायकलवारी १३६ किमीचा पल्ला पूर्ण करून लातूर येथे मुक्कामी असेल. पुढे लातूर ते धाराशिव १११ किमी आणि २१ जून रोजी धाराशिव ते पंढरपूर असा ९० किमीचा वारीचा शेवटचा टप्पा असेल. या तिन्ही टप्प्यांत प्रवासादरम्यान स्थानिक ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त स्वागत, सहकार्य आणि भोजन व्यवस्था होणार असून, सहभागी भाविकांची आरोग्य तपासणी आणि प्राथमिक उपचाराची व्यवस्था केल्याचे डॉ. सुकेशनी शिंदे यांनी सांगितले.
सायकल चालवणे एक जीवनपद्धतीसमाजात वाढणारे प्रदूषण, आरोग्याविषयी अनास्था आणि गतिमान जीवनशैलीतील ताण याला उत्तर देत, सायकल हे केवळ वाहन नसून, एक जीवनपद्धती म्हणून मांडण्याचा हा प्रयत्न आहे. श्रद्धा आणि सायकल या दोघांची सांगड घालत नांदेड येथून पंढरपूरपर्यंत तब्बल ३२१ किलोमीटरचा प्रवास सायकलवरून करण्यात येणार आहे. - अर्पित फुलोर