नांदेड - नांदेडमध्ये बंजारा समाजाच्या बैठकीत जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केलेले वक्तव्य त्यांच्या कार्यक्षमतेवरच नव्हे, तर एकूणच अभ्यासावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. 'मी कधीच परीक्षा दिली नाही, कुणी माझा पेपर तपासला नाही, मग मी नापास कसा? असे वक्तव्य करून संजय राठोड यांनी स्वतःच्या जबाबदारीपासून हात झटकण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला आहे.
मंत्रिमंडळाच्या प्रगतीपुस्तकात राठोड यांना नापास म्हणून दाखवले गेले आणि त्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी 'मीच तुम्हाला नापास करेन' असा रोखठोक, पण असंवैधानिक इशारा देत माजी मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्ष टोला लगावला.
शिंदे गटाचा मंत्री असताना ठाकरे गटाशी जवळीक ज्याने कोणतीच परीक्षा दिली नाही, तो मंत्री कसा झाला? ही विचारण्याजोगी गोष्ट आहे. जर मंत्री होण्यासाठी कर्तृत्व, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची परीक्षा लागत नाही, तर मग ही पदे काय केवळ ‘फोन येतात’ म्हणून मिळतात का? तसेच त्यांनी 'उद्धव ठाकरे यांचे आजही मला फोन येतात.' हे म्हणत त्यांनी सत्तेत असूनही दोन तटांवर पाय ठेवण्याचा प्रयत्न केला की काय? अशी कुजबूज उपस्थितांमध्ये सुरू झाली होती. दरम्यान, शिंदे गटाचा मंत्री असताना ठाकरे गटाशी जवळीक दाखवणे ही राजकीय निष्ठेची विटंबना नाही का? अशी चर्चा आहे.
म्हणे, मी तसे बोललोच नाही...मंत्री संजय राठोड यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल पत्रकारांनी त्यांना विचारले असता ते म्हणाले, 'मी असे बोललोच नाही.' त्यांनी घेतलेल्या या यू टर्नची देखील राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.