नांदेड : केवळ फोटो सेशनपुरते कार्य नको, तर प्रत्येक गोरगरिबापर्यंत योजना पोहोचवण्यासाठी नायगाव मतदारसंघात विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. विशेष म्हणजे उपवधूंच्या पित्यांना मुलींच्या लग्नासाठी हातभार लावणारी अफलातून योजना आमदार राजेश पवार हे त्यांच्या स्वखर्चातून मतदारसंघात राबवित आहेत. लेकीच्या सप्तपदीसाठी बापाला हातभार लावणाऱ्या या योजनेची नांदेडातच नव्हे, तर राज्यात चर्चा होत आहे.
पुण्याच्या पिंपरी-चिंचवडमध्ये घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवले. वैष्णवी हगवणे हीच्या आत्महत्येनंतर पुणे, अहिल्यानगर आदी ठिकाणच्या मराठा समाजाने लग्नांसाठी एक आचारसंहिता घालून दिली. त्यातून वधुपित्याचा होणारा अनाठायी खर्च टाळला जावा हा उद्दात्त हेतू आहे. परंतु, कोणत्याही पित्याला आपल्या मुलीच्या लग्नात जेवणावळी उठवाव्या वाटतात अन् लेकीचे लग्न थाटामाटात करावे वाटते. मात्र, त्यासाठी कर्ज काढणे अथवा जमीन, घर विक्री करून हा बडेजाव करणे चुकीचेच आहे. पण, अशा गोरगरीब अन् गरजू वधुपित्यांसाठी नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार यांनी ‘चिंता मिटली, नवरी सजली!’ या संकल्पनेतून स्वखर्चातून एक योजना राबविण्यास सुरुवात केली आहे.
सप्तपदीसाठी माझा हातभार... एक भाऊ म्हणून आमदार पवार यांचा हा छोटासा प्रयत्न अनेक बापांचे प्राण वाचविणारा अन् लेकीचे स्वप्न पूर्ण करणारा ठरत आहेत. मुलीच्या लग्नासाठी स्वखर्चातून आर्थिक मदत देणारी ही योजना मुलीचा पाठीराखा भाऊ, म्हणून चर्चेत आली आहे. या योजनेच्या माध्यमातून ४ ते ६ लग्न एकत्र करणाऱ्यांना मंडप, जेवण किंवा भांडी यातील कोणताही एक पूर्ण खर्च, तसेच ७ ते १२ लग्न एकत्र होणार असतील तर मंडप आणि जेवणावळी असा दोन्हीचा संपूर्ण खर्च आमदार पवार स्वत: उचलणार आहेत. या सामूहिक विवाह सोहळ्यात नायगाव मतदारसंघातील किमान २ मुलींचा समावेश असणे गरजेचे आहे. त्यांनी सामाजिक जाणिवेतून सुरू केलेल्या या योजनेचे वधुपित्यांसह समाजातून स्वागत होत आहे.
सामाजिक बांधिलकीतून उपक्रमलोकप्रतिनिधी म्हणून लग्न समारंभामध्ये गेल्यानंतर अनेक गरीब पित्यांकडून केला जाणारा खर्च पाहवत नाही. अनेकजण लेकीच्या प्रेमापोटी व्याजाने पैसे काढून, जमीन विक्री करून लग्न करतात. त्यामुळे उद्या या बापाचे काय होणार? असा विचार करून मन विचलित होते. त्यातूनच एक भाऊ या नात्याने मतदारसंघातील मुलींच्या लग्नाला छोटीशी मदत म्हणून ‘चिंता मिटली, नवरी सजली!’ या संकल्पनेतून एक योजना स्वखर्चातून सुरू केली आहे. समाजातील हुंडा प्रथा बंद व्हायला तयार नाही, लग्नासाठी मुली मिळत नसल्या, तरी हुंडा कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचे स्वरूप बदलले असून, पैशांऐवजी आता सोने, गाडी, बंगला अशा अपेक्षा वधुपित्यांकडून केल्या जात आहेत. त्यावर लगाम घालणे कठीण आहे. पण, प्रत्येकाने सामाजिक जाणिवेतून वधुपित्याला मदत करावी अन् तन-मन-धनाने त्याच्यासोबत राहावे. नक्कीच हुंडाबळी, बापाच्या आत्महत्या अन् कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना कमी होतील.- राजेश पवार, आमदार नायगाव.