हदगाव: वरवट गावात शेतातून परत येणाऱ्या दोन चिमुकल्या आणि त्यांची आई ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना दुपारी घडली. ग्रामस्थानी शोध घेतला असता दोन मुलीचा मृतदेह आढळला असून आईचा शोध सुरू आहे.
मागील तीन चार दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मात्र, सकाळपासून उघडिप दिल्याने शेतकरी पेरणीपूर्वीची कामे करण्यासाठी शेतात गेले होते. दरम्यान, दुपारी १२ वाजता ढगफुटी सदृश्य पावसाला सुरूवात झाली. एक ते दिड तास सतत पाऊस कोसळला. यामुळे वरवट गावालगत असलेल्या ओढ्याला अचानक पुर आला. दरम्यान, अरुणा बळवंत शकीरगे (३५) या दुर्गा बळवंत शकीरगे(८) व समीक्षा विजय शकीरगे(७) या चिमुकल्यासोबत शेतातून घराकडे निघाल्या. मात्र, पुराचा अंदाज न आल्याने तिघी ओढ्यात वाहून गेल्या.
माहिती मिळताच ग्रामस्थांनी ओढ्यात तिघीचा शोध सुरू केला. काहीवेळाने दुर्गा, समीक्षा आणि अरुणा शकीरगे यांचा मृतदेह आढळला. ही घटना समजताच तहसीलदार सुरेखा नांदे, तलाठी, मंडळ अधिकारी आणि पोलीस यंत्रणा घटनास्थळी पोहचली असून शोध कार्य सुरू आहे.