किनवट (जि. नांदेड) : नांदेड, हिंगोली, लातूर या तीन जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या आदिवासी विकास विभागाचे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती (जातपडताळणी कार्यालय) किनवटच्या नावे असले तरी कारभार मात्र किनवटपासून ४०० किलोमीटर अंतरावर असलेल्या छत्रपती संभाजीनगरला सुरू आहे. त्यामुळे गोरगरीब आदिवासींची परवड सुरू आहे.
कोणत्याही निवडणुकीसाठी असो किंवा शैक्षणिक प्रवेशासाठी असो जात प्रमाणपत्राची पडताळणी आवश्यक असते; परंतु त्यासाठी ४०० किलोमीटर दूर असलेल्या छत्रपती संभाजीनगरात जावे लागते. यामुळे गोरगरीब आदिवासींना वेळ आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. अनुसूचित जमातीच्या लोकांसाठी हे मुख्यालय गैरसोयीचे ठरले आहे.
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. नांदेड, हिंगोली, लातूरचे कार्यक्षेत्र असलेल्या किनवट समितीचे मुख्यालय किनवट येथे हलवावे, अशी मागणी अजित पवार गटाचे किनवट तालुका अध्यक्ष संजय सिडाम यांनी केली आहे. यात आदिवासी विकासमंत्री अशोक उईके, मंत्री नरहरी झिरवाळ यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.