लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : टाकळघाट येथील रहिवासी चैताली मनोज कामडी हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. परंतु, चैतालीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली आहे. यात दोषी असलेला तिचा पती, सासू-सासरे यांना फाशीची शिक्षा देऊन मुलीला न्याय द्यावा, अशी मागणी चैतालीचे वडील रामदास मेघरे यांनी पत्रकार परिषदेत केली.
वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील शेकापूर (बाई) येथील रामदास मेंघरे यांची मुलगी चैतालीचे लग्न १६ एप्रिल २०२५ रोजी टाकळघाट येथील मनोज रमेश कामडे याच्याशी झाले. चैतालीचे वडील रामदास म्हणाले, लग्नानंतर चैतालीच्या सासरच्या मंडळींनी तिला कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्रास देणे सुरू केले. परंतु, आज ना उद्या सगळे ठीक होईल म्हणून ती निमूटपणे सर्व सहन करीत होती. मूल होत नसल्यामुळे तिचा छळ करण्यात येत होता. ९ जून २०२५ रोजी चैतालीचा भाऊ गणेश तिला सासरी सोडण्यासाठी गेला असता त्याच्या समोरच चैतालीच्या सासूने तिला खडेबोल सुनावले. त्यानंतर १६ जूनला जावई मनोज कामडी याने फोन करून चैतालीने फाशी घेतल्याचे सांगितले. बुटीबोरीच्या माया हॉस्पिटलमध्ये माहेरची मंडळी गेली असता चैतालीच्या अंगावर पट्टयाने मारल्याच्या जखमा दिसत होत्या. याशिवाय व्हेंटिलेशनच्या उंच असलेल्या खिडकीला ओढणी बांधून चैतालीने गळफास घेणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
चैतालीने गळफास घेतल्यानंतर आपण सब्बलने दाराची कडी काढल्याचे तिचा पती सांगत असून प्रत्यक्षात दाराची कडी मात्र जशीच्या तशी होती, असे मेंघरे यांनी सांगितले. त्यामुळे चैतालीची आत्महत्या नसून तिच्या सासरच्या मंडळींनी तिची हत्या केली असून त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली. पत्रकार परिषदेला चैतालीचा भाऊ गणेश मेघरे, काका संदीप मेघरे, अरविंद डफ, गजानन मेघरे, राजेश्वर मेघरे, पवन तडस, शैलेंद्र सोरते, जगदीश फुलझेले, पंकज कोसुरकर उपस्थित होते.