परवाना नूतनीकरणाला अत्यल्प प्रतिसाद : शेवटची तारीख ३० नोव्हेंबरनागपूर : राज्याच्या विविध शहरांमधील सुमारे दीड लाख आॅटोरिक्षांचे परवाने अनेक कारणास्तव परिवहन विभागाने रद्द केले होते. आता या परवान्यांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. परंतु याला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याने अंतिम मुदतीत तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. आता शेवटची तारीख ३० नोव्हेंबर आहे. राज्यात सद्यस्थितीत ७ लाख २६ हजार आॅटोरिक्षा परवाने आहेत. यातील १ लाख ४० हजार ६५ आॅटोरिक्षांचे परवाने परिवहन विभागाने रद्द केले आहेत. त्यांच्या नूतनीकरणाचा आग्रह आॅटोरिक्षा चालक संघटनांनी धरला होता. अखेर परिवहन विभागाने आपले जुने आदेश मागे घेत परवान्यांचे नूतनीकरण करण्याचे नवे आदेश काढले. परवाना नूतनीकरणाची शेवटची मुदत ३१ आॅक्टोबर देण्यात आली होती; नंतर ती वाढवून १६ नोव्हेंबर २०१५ करण्यात आली आहे. यादरम्यान अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या आॅटोरिक्षांवर जप्तीची मोहिमही सुरू केली, तरीही अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याने तिसऱ्यांदा परिवहन विभागाने अंतिम मुदतीत वाढ केली. आता ती ३० नोव्हेंबर करण्यात आली आहे. या तारखेपर्यंत परवानाधारकांनी परवाना नूतनीकरण केले नाही तर त्यांचे परवाने कायमचे रद्द होणार आहेत. (प्रतिनिधी)
आॅटोरिक्षा परवान्याच्या मुदतीत तिसऱ्यांदा वाढ
By admin | Updated: November 13, 2015 02:54 IST