राजेश शेगोकारनागपूर : बी. टेक.चे शिक्षण घेत असलेल्या तिघांनी एका स्पेअर्स पार्ट वितरकाचा केलेल्या खूनप्रकरणाने केवळ शहरालाच नव्हे तर संपूर्ण समाजमनाला हादरवून सोडले आहे. रस्त्याच्या कडेला मद्यधुंद अवस्थेत कारमध्येच पडून असलेल्या त्या वितरकाला मदत करावी या भावनेतून सुरू झालेली एक साधी कृती काही क्षणांत क्रौर्यात बदलते आणि अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी मारेकरी बनतात, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. हा गुन्हा आहेच तो कायद्याच्या चौकटीत शिक्षेला पात्र होईलच पण प्रश्न तिथेच संपत नाही, ही घटना तरुण मनाच्या घडणीत होत असलेल्या गंभीर बदलांचा संकेत देणारी आहे.
वडधामना परिसरात घडलेल्या या घटनेतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सुरुवातीला त्या विद्यार्थ्यांनी मदतीची भूमिका घेतली होती. म्हणजेच त्यांच्या मनात माणुसकीचा अंश निश्चितच होता. मात्र, अचानक समोर आलेली महागडी कार आणि मोबाइल यांचा मोह त्यांच्या विवेकावर भारी पडला. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर याला 'क्षणिक आवेगाचे नियंत्रण हरवणे' असे म्हणता येईल. तरुण वयात मेंदूची आकर्षण, लोभ आणि जोखीम घेण्याची प्रवृत्ती अधिक तीव्र असते. त्यामुळेच, परिणामांचा विचार न करता घेतलेले असे घातक निर्णय आयुष्यभराची शिक्षा देणारे ठरतात.
अलीकडच्या काळात समाजात भौतिकतावादाचा प्रभाव झपाट्याने वाढत आहे. सोशल मीडियामुळे 'दिसणे' आणि 'दाखवणे' याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. महागड्या वस्तू म्हणजे प्रतिष्ठा, असा एक चुकीचा समज तरुणांमध्ये निर्माण होत आहे. यामुळे सहजपणे मिळणाऱ्या सुखाच्या मागे धावण्याची मानसिकता तयार होते. 'हेच तर वय आहे, सर्व काही मिळवायचे' या विचाराने संयम, कष्ट आणि नैतिकता या मूल्यांना दुय्यम स्थान मिळते. या सर्व पार्श्वभूमीवर शिकविण्याची पद्धती व विषय यांचीही चर्चा येणे स्वाभाविक आहे. आज विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञान दिले जाते, परंतु भावनिक बुद्धिमत्ता, नैतिक मूल्ये आणि जीवनकौशल्ये शिकवण्यावर पुरेसा भर दिला जात नाही. पालक आणि समाज यांची भूमिकाही येथे तितकीच महत्त्वाची आहे. केवळ आर्थिक यशावर भर देण्याऐवजी मुलांमध्ये संवेदनशीलता, संयम आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करणे आवश्यक आहे आपली सगळ शिक्षण व्यवस्था याच मुद्यावर अपयशी ठरत आहे. नागपूरमधील ही घटना अपवाद नाही, तर वाढत्या प्रवृत्तीचे द्योतक आहे. जर वेळेत यावर उपाययोजना केली नाही, तर अशा घटना अधिक गंभीर स्वरूप धारण करू शकतात.
शिक्षणसंस्था, कुटुंब आणि समाज यांनी एकत्र येऊन तरुण पिढीला योग्य दिशा देण्याची गरज आहे. आज प्रश्न त्या तीन विद्यार्थ्यांचा नाही, तर प्रत्येक घरातील, प्रत्येक वर्गातील, प्रत्येक तरुण मनातील आहे. कारण मोहाचा तो क्षण कोणाच्याही आयुष्यात येऊ शकतो. फरक इतकाच कोणी त्या क्षणावर मात करतो, तर कोणी त्या क्षणाचा गुलाम होतो. नागपूरची ही घटना मोहाच्या त्याच क्षणाला बळ पडलेल्यांची कथा आहे. या क्षणाला सामान्य घरातील हे विशीतले तिघे बळी पडले व त्यांचे आयुष्यच आता अंधकारमय झाले आहे. त्यामुळेच आज गरज आहे ती केवळ प्रगतीचीच नाही, तर विवेक आणि मूल्यांची जपणूक करण्याची तरुणांना हे कोणी सांगायचे हाच काय तो प्रश्न आहे?
हिंसेचे सामान्यीकरण
एखादी व्यक्ती एकटी असताना जे कृत्य करणे शक्य नसते, ते ग्रुपच्या प्रभावाखाली सहज घडते. ग्रुपमुळे जबाबदारीचे भान कमी होते आणि चुकीच्या कृतीला समर्थन मिळते. वेब सिरीज, चित्रपट आणि डिजिटल माध्यमांमधून हिंसेचे सतत होणारे प्रदर्शनही तरुण मनाला हळूहळू संवेदनशून्य करत आहे. त्यामुळे हिंसा ही एक 'सामान्य' गोष्ट असल्याची चुकीची धारणा तयार होते. विदर्भातील अकोल्यातही परवा काही तरुणांनी धुरंधर पाहून येताच घातलेल्या धुडगुसाचे मूळदेखील हेच आहे. हिंसेचे होत असलेले सामान्यीकरण व ग्रुपमध्ये घेतले जाणारे निर्णयही धोकादायक वळण घेत आहेत.
Web Summary : Engineering students, initially intending to help, murdered a businessman for his car and phone. The incident highlights rising materialism, lack of moral education, and the normalization of violence among youth, demanding societal introspection and value-based education.
Web Summary : मदद करने निकले इंजीनियरिंग छात्रों ने कार और मोबाइल के लिए व्यापारी की हत्या कर दी। घटना बढ़ती भौतिकवाद, नैतिक शिक्षा की कमी और युवाओं में हिंसा के सामान्यीकरण को दर्शाती है, जिससे सामाजिक आत्मनिरीक्षण और मूल्य-आधारित शिक्षा की मांग होती है।