नागपूर : हिंदुत्व ही मूल्याधिष्ठित जीवनशैली आहे. भगवे झेंडा घेऊन रस्त्यावर उतरणे किंवा काही कृती करणे हे हिंदुत्व नाही. आपण पूजेदरम्यानही विश्वकल्याणाची प्रार्थना करतो. अनेकतेतून एकता आणि सर्वधर्म समभाव हे भारतीयतेचे खरे रूप आहे, हेच हिंदुत्व आहे. मात्र, काँग्रेसने हिंदुत्वाचा अर्थ चुकीचा लावला, असा आरोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला.
शनिवारी नागपुरातील प्रकट मुलाखतीत २०२९ मध्ये तुम्ही कुठल्या भूमिकेत असाल असे विचारले असता गडकरी यांनी ‘रिअल फिल्म अभी बाकी है’ असे व्यक्तव्य केले.
नरेंद्र मोदी सरकारच्या ११ वर्षांतील कामगिरीच्या पार्श्वभूमीवर सुरेश भट सभागृहात आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांनी गडकरी यांची मुलाखत घेतली.
२०२९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील भूमिकेबाबत विचारले असता गडकरी म्हणाले, ११ वर्षांत जे पाहायला मिळाले, ते केवळ एक न्यूज रील होते, खरी फिल्म अजून सुरू व्हायची आहे. पक्ष जबाबदारी देईल ती स्वीकारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी गडकरी यांनी विविध योजनांचा आढावा घेतला.
विकास खूप, लोकसंख्या वाढत असल्याने दिसत नाही
विकासासोबत दरडोई उत्पन्न वाढले का, असा प्रश्न केला असता गडकरी म्हणाले, मोदी सरकारच्या ११ वर्षांच्या कार्यकाळात चौफेर विकास झाला आहे. काँग्रेसच्या ६० वर्षांच्या काळात जेवढा विकास झाला नाही तो या काळात झाला; परंतु वाढत्या लोकसंख्येमुळे लोकांना विकास दिसत नसल्याचे गडकरी म्हणाले.
बडगुजरबाबत मौन
सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाबाबत विचारले असता, गडकरी म्हणाले, त्यांना याबाबत कोणतीही माहिती नाही. भाजप ही कार्यकर्त्यांची आणि विचारधारेची पक्षसंस्था आहे. मिळालेली लोकप्रियता कार्यकर्त्यांचे श्रेय आहे. विदर्भाला शेतकरी आत्महत्यामुक्त करायची इच्छा त्यांनी व्यक्त केली.