‘जनमंच’चे आंदोलन : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जग एकजूट नागपूर : आज पर्यावरण, कुपोषण व दहशतवाद यासारख्या मुद्यांवर जग एकजूट झाले असतांना आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सुद्धा संपूर्ण जग एकत्र होत आहे. यासाठी निमित्त ठरत आहे, तो स्वामीनाथन आयोग. ‘जनमंच’ने नुकत्याच ३० आॅक्टोबर रोजी केलेल्या आंदोलनाची संपूर्ण जगाने दखल घेतली आहे. शिवाय जगाचे शेतकऱ्यांचे प्रश्न व समस्यांकडे लक्ष वेधले आहे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी जगापुढे जाताच सर्व देशांना आपल्या येथील शेतकऱ्यांचे सुद्धा हेच प्रश्न व समस्या असल्याची जाणीव झाली आहे. शिवाय त्यातून जागतिक चर्चा घडविण्याचा विचार पुढे आला आहे. अशाप्रकारे केवळ भारतच नव्हे, तर संपूर्ण जगातील शेतकऱ्यांच्या हिताचा असलेल्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी तात्काळ लागू करण्यात याव्या, अशी मागणी ‘जनमंच’ आणि विविध संस्था व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी ‘लोकमत व्यासपीठ’ च्या मंचावर केली.विशेष म्हणजे, जनमंच, भूमिपुत्र संघर्ष वाहिनी, ‘ग्राम आर्ट प्रोजेक्ट’ व ‘अलग अँगल’ या वेगवेगळ्या संस्था व संघटनांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकजूट होउन स्वामीनाथन आयोगासाठी संघर्ष सुरू केला आहे. शिवाय ३० नोव्हेंबर ते १० डिसेंबर दरम्यान यूएनतर्फे पॅरिस येथे हवामान परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्यात जगभरातील शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर विचार - मंथन होणार आहे. त्यातच ‘ग्राम आर्ट प्रोजेक्ट’च्या संचालिका श्वेता भट्टड यांना कलाविष्काराच्या सादरीकरणासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. त्यानुसार भट्टड या ७ डिसेंबर रोजी ‘फेथ इन पॅरिस’ यावर कलाविष्काराचे सादरीकरण करणार आहेत. या कलाविष्कारामध्ये भट्टड या भारतमातेच्या वेषात स्वत: ला जमिनीमध्ये गाडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे जगाचे लक्ष वेधतील. शिवाय या कलेचे प्रात्यक्षिक सुरू असताना जगभरातील शेतकरी स्वामीनाथन आयोगाबद्दल आपआपली मते व्यक्त करणार आहे. तसेच इंटरनेटच्या माध्यमातून भट्टड यांचा हा कलाविष्कार आणि जगभरातील विचारवंतांची मते जगभरातील लोकांपर्यंत पोहोचतील. या चर्चेत ‘जनमंच’चे अध्यक्ष अॅड़ अनिल किलोर, ‘जनमंच’चे सल्लागार प्रा. शरद पाटील,भूमिपुत्र संघर्ष वाहिनीचे अभिताभ पावडे, ग्राम आर्ट प्रोजेक्टच्या संचालिका श्वेता भट्टड व अलग अँगलचे ललित विकमशी यांनी भाग घेतला होता. (प्रतिनिधी)
स्वामीनाथन आयोगाची जगात दखल
By admin | Updated: November 18, 2015 03:14 IST