गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील ४२० नक्षलवाद्यांसह राज्यातील गोंदिया, चंद्रपूर व यवतमाळ या नक्षलग्रस्त जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत ४३६ नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण करून नवजीवनाची वाट धरली आहे. गृह विभागाने २९ आॅगस्ट २००५ पासून नक्षलवाद्यांसाठी आत्मसमर्पण योजना सुरू केली. गडचिरोलीतील ४२० समर्पितांपैकी ३६७ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनाचे प्रस्ताव असून यापैकी १७० प्रस्ताव मंजूर आहेत, तर उर्वरीत प्रस्ताव मंजूरीची कार्यवाही सुरू आहे. नक्षलवाद्यांसाठी आत्मसमर्पण योजना सुरू केल्यापासून आत्तापर्यंत एकूण ९ टप्प्यात ४२० नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. आतापर्यंत नक्षल चळवळीत पती-पत्नी म्हणून काम करणार्या ३० जोडप्यांनीही या योजनेंतर्गत आत्मसमर्पण केले. अल्पशिक्षीत १५ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि खाजगी वाहन प्रशिक्षण संस्थेमधून वाहन चालकाचे प्रशिक्षण देऊन त्यांना वाहन चालविण्याचे परवाने देण्यात आले आहेत. सहा आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांनाही शिवणकामाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून एका आत्मसर्पित नक्षलवाद्याला इलेक्ट्रीक फिटींगचे आणि ५ सदस्यांना खाजगी यंत्रणेच्या माध्यमातून नळ फिटींग (प्लम्बिंग) चे प्रशिक्षण देण्यात आले आहे. २० सदस्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध प्रशिक्षणाच्या आधारावर विविध कंपन्यांमध्ये रोजगार प्राप्त झाला आहे. काही सदस्य पोलिस विभागामध्ये विशेष पोलिस अधिकारी म्हणून, तर काही पोलिस विभागात रोजंदारीची कामे करीत आहेत. आत्मसमर्पण करणार्या नक्षलवाद्यांना २ कोटी ७२ लाख ८० हजार ३०५ रुपये, तर केंद्र शासनाच्या सुरक्षाविषयक खर्च योजनेतून ४२ लाख ५० हजार रुपए असे एकूण ३ कोटी १५ लाख ३० हजार ३०५ रूपयांची आर्थिक मदत करण्यात आली. आत्मसमर्पण योजना राबवून अहिंसा मार्गाचा स्वीकार करण्यासाठी पुनर्वसन करण्याची हमी शासनाने घेतली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
राज्यभरात ४३६ नक्षल्यांचे आत्मसमर्पण
By admin | Updated: May 18, 2014 01:04 IST