हायकोर्ट : दोन महिला आरोपींची निर्दोष सुटकानागपूर : नवऱ्यापासून स्वत:चे कुकृत्य लपविण्यासाठी वेश्या व्यवसायातील एका महिलेने अपहरणाची बनावट कथा रचली. ही बाब लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या प्रकरणातील दोन महिला आरोपींना निर्दोष सोडले आहे. रेखा वसंत मोहुर्ले (२६) रा. भिवापूर व तारा श्याम पांढरे (४१) रा. पडोळेनगर, नागपूर अशी आरोपींची नावे आहेत. नागपूर सत्र न्यायालयाने १० एप्रिल २०१३ रोजी आरोपींना भादंविच्या कलम ३६६, ३४ (अपहरण)अन्वये दोषी ठरविले होते. याविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात फौजदारी अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द करून अपील निकाली काढले. खटल्यातील माहितीनुसार, पीडित महिलेने उमरेडजवळच्या उदासा येथील व्यक्तीशी दुसरे लग्न केले असून, पहिल्या पतीपासून तिला दोन मुले आहेत. मुले ब्रह्मपुरी तालुक्यातील नीलज येथे राहतात. ती मुलांना भेटण्यासाठी नीलजला गेली होती. परत येताना तिला रेखाचा फोन आला. यामुळे ती उदासा येथे परतण्याऐवजी भिवापूर येथे रेखाच्या घरी गेली. तेथून दोघीही नागपूर येथे तारा पांढरेच्या घरी आल्या. यानंतर तिघीही मध्य प्रदेशातील कारकारिया गावात गेल्या. तेथे आरोपी रामचंद्र मेघवाल व देवीलाल मेघवाल यांच्या घरात पीडितेला डांबून ठेवण्यात आले होते. रेखा व ताराने तिला ३५ हजारात विकले होते. यानंतर पीडितेने पतीला फोन करून अपहरणाची माहिती दिली. पतीने १२ मार्च २०१० रोजी उमरेड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी मध्य प्रदेशात जाऊन तिची सुटका केली. तसेच आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३६६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. पीडित महिलेने आपल्या बयानात अपहरणाची अशी कथा सांगितली. न्यायालयाचा यावर विश्वास बसला नाही.(प्रतिनिधी)
वेश्याव्यवसायातील महिलेने रचली अपहरणाची कथा
By admin | Updated: June 24, 2014 13:12 IST