नागपूर : लोकमान्य टिळक १९१८ साली यवतमाळ येथे आले होते. त्यावेळी ब्रिटिशांच्या विरोधात समाजमन तयार करण्यासाठी त्यांनी लोकनायक बापूजी अणे यांना एखादे वृत्तपत्र, साप्ताहिक सुरू करण्याची विनंती केली आणि जनतेचे प्रबोधन करण्याचे सुचविले. १९३३ पर्यंत लोकमत हे साप्ताहिक बापूजी अणे यांनी चालविले. त्यानंतर जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजींनी हे साप्ताहिक आणि त्यानंतर अर्ध साप्ताहिक काढले. १९७१ साली त्याचे रुपांतर दैनिकात करण्यात आले. जीव ओतून काम करणाऱ्या आमच्या चमूच्या भरवशावर लोकमत आज वाचकांचे क्रमांक एकचे वृत्तपत्र झाले आहे. यानंतरही भविष्यात सातत्याने परिपूर्ण वृत्तपत्र देण्यासाठी आम्ही प्रयत्नरत राहू, असे मत माजी शालेय शिक्षण मंत्री आणि लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी व्यक्त केले. पां. वा. गाडगीळ यांनी सामाजिक-आर्थिक विपुल लेखन केले. परिवर्तनसाठी त्यांनी लेखणी झिजविली. बाबा दळवींनीही शोधप^त्रकारितेच्या माध्यमातून समाजाला जागृत केले. लोकांचे प्रश्न घेऊन त्यांच्यासाठी काम करण्याची परंपरा लोकमतने सांभाळली आहे. १९४२ च्या आंदोलनात बाबूजी कारागृहात गेले. त्यावेळी कारागृहातून बाहेर पडू, असे वाटलेच नाही, असे मत बाबूजींनी व्यक्त केले होते. त्यांनी लोकांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यामुळेच आम्ही घडलो, असे राजेंद्र दर्डा म्हणाले. सध्या लोकशाहीत अभ्यासपूर्ण भाषणांची उणीव जाणवते आहे. लोकशाहीचे धिंडवडे उडत आहेत. विधिमंडळात गोंधळ वाढतो आहे. शासनाने विरोधकांना विश्वासात घ्यायला हवे आणि विरोधकांनीही एखाद्या चांगल्या विधेयकाला मार्गी लावण्यासाठी सहकार्य केले पाहिजे. पण हे घडताना दिसत नाही. त्याशिवाय लोकशाही समृद्ध होणार नाही, असे ते म्हणाले.
परिपूर्ण वृत्तपत्र देण्यासाठी प्रयत्नरत राहू : राजेंद्र दर्डा
By admin | Updated: December 17, 2015 03:16 IST