गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या आंतरराष्ट्रीय विभागाचा अध्यक्ष आणि दिल्ली विद्यापीठातील इंग्रजीचा प्राध्यापक जी. एल. साईबाबा याला अटक केल्यानंतर लगेच गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी भूसुरूंग स्फोट घडवून आणत सात जवानांना ठार केले. गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांनी गेल्या वर्षभरात ३५ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. त्यामुळे पोलीस दल नक्षलवाद्यांवर वरचढ झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. विशेष पोलीस दलाचे महानिरीक्षक रवींद्र कदम व गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक सुवेज हक हे दोन अधिकारी या जिल्ह्यातील नक्षल कारवाया थोपविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. परंतु साईबाबा याच्या अटकेनंतर राजधानीपर्यंत नक्षलवाद्यांची पाळेमुळे असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. परंतु सरकार दरबारात या प्रश्नासंदर्भात उदासीनता बाळगणार्यांची संख्या अधिक आहे. राज्याच्या मुंबई, पुणे व इतर मोठ्या महानगरांमध्ये अनेक लोक नक्षल चळवळीत काम करीत आहेत. याची माहिती राज्याच्या गुप्तचर यंत्रणेलाही असली तरी त्यांच्यावर जरब कसण्याचे काम सरकार व राज्याच्या गृह विभागाच्या इतर अधिकार्यांकडून होताना दिसत नाही. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस जवानांना नाहक आपला जीव गमवावा लागत आहे. एप्रिल व मे २०१४ चा विचार करता आतापर्यंत नऊ पोलीस जवान शहीद झाले आहेत. प्रा. साईबाबा याला अटक केल्यानंतर ही घटना लगेच घडल्याने या दोन्ही घटनांचा संबंध जोडला जात आहे.
साईबाबाच्या अटकेशी स्फोटाचा संबंध ?
By admin | Updated: May 12, 2014 04:20 IST