खंडणी वसुलीसाठी मोबाईलचा वापर : जामर लावण्याची गरजराहुल अवसरे - नागपूरकडेकोट सुरक्षाव्यवस्था भेदून नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात सर्रासपणे मोबाईल पोहोचत आहेत. बंदिस्त कच्चे कैदी मोबाईलचा वापर करून खंडणी वसूल करीत आहेत. व्यापारी आणि अन्य व्यवसायिकांमध्ये दहशत पसरवीत आहेत. कारागृह सुरक्षा व्यवस्थेचे हे अपयशच आहे. यावर मात म्हणून कारागृहातील मोबाईल सेवाच निष्क्रिय करण्याची गरज आहे. त्यासाठी परिसरात जामर यंत्रणा उभारण्यात यावी किंवा नजीकचे संपूर्ण मोबाईल टॉवर सील करावे, असे जाणकार सूत्रांचे म्हणणे आहे. आपल्या गुन्हेगारी कृत्याने समाजात दहशत निर्माण करणाऱ्या व्यक्तींच्या गुन्हेगारी प्रवृत्तीत सुधारणा व्हावी, समाज व्यवस्था सुरक्षित व निर्भय राहावी, या मुख्य हेतूतून कारागृहांची निर्मिती झाली. परंतु हल्ली कारागृह हे समाजात दहशत पसरविणाऱ्या गुन्हेगारांसाठी अड्डे झाले आहेत. खंडणी वसुली आणि ‘सुपारी किलिंग’ चे गुन्हे कारागृहाच्या उंच भिंतीच्या आडून घडत असेल तर कारागृह निर्मितीमागील मूळ हेतूच संपुष्टात येतो. उंच भिंतीआडून अनेक गुन्हे घडतात परंतु काहीच चव्हाट्यावर येतात. अनेक जण भीतीपोटी तक्रार करण्याचे धाडसच करीत नाहीत. कारागृहातून खंडणी वसूल करण्याचा नुकताच एक प्रकार उजेडात आला. अजनी भागात राहणारा कुख्यात गुन्हेगार अमर लोहकरे हा महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण कायद्यांतर्गत मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहे. सध्या तो कच्चा कैदी आहे. त्याने २५ मे २०१४ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास बजरंगनगर येथील हार्डवेअर व्यवसायी शेषराव आष्टनकर यांना कारागृहातून बाहेर येण्यासाठी दोन लाखांच्या खंडणीची मागणी केली. या व्यावसायिकाने हिम्मत करून अजनी पोलीस ठाण्यात या गुंडाविरुद्ध तक्रार केली आणि कारागृहात चालणारे कारस्थान उजेडात आले. चालू वर्षाच्या प्रारंभीच कारागृह अधिकाऱ्याने आपल्या पथकासह कारागृहात धाडी घालून मोंटी भुल्लर खुनातील आरोपी दिवाकर कोथुलवार, आशिष कोथुलवार, मंगेश शेंडे, सेव्हन हिल्स बार खुनातील आरोपी तुषार दलाल, लच्छू फाये आणि अन्य एक कुख्यात गुन्हेगार संजय अवतारे यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणावर मोबाईल, रोख रक्कम आणि मादक पदार्थ जप्त करण्याची कारवाई केली. हे मोबाईल नेमके कोणाचे होते, ते कारागृहात कसे काय आले, मोबाईलचा कोणत्या कामासाठी वापर झाला आदी अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. धाडीच्या या प्रकरणावरच पुढे पांघरूण घालण्यात आले. कारागृहात दाखल होणाऱ्या आरोपींची वेगवेगळ्या टप्प्यात कसून अंगझडती घेतली जाते. तरीही मोबाईल आणि आक्षेपार्ह वस्तू कशा काय आत झिरपतात, असा प्रश्न आहे. आजही अनेक मोबाईल कारागृहात असून त्यांचा वापर खंडणी वसुली आणि साक्षीदारांना फितूर करण्यासाठी केला जात आहे. ‘लँड लाईन’चाच वापर हवाकारागृहातून सुरू झालेली ही नव्या स्वरूपाची गुन्हेगारी रोखणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा तिला भविष्यात आणखी भयावह स्वरूप प्राप्त होऊ शकते. कारागृह सुरक्षाही धोक्यात येऊ शकते. कारागृह प्रशासनाने संपर्कासाठी केवळ ‘लँड लाईन’चाच वापर केला पाहिजे. कारागृह परिसरात संपूर्ण जामर यंत्रणा बसविली जावी किंवा या परिसरातील संपूर्ण मोबाईल टॉवर सील केले जावे, असेही या सूत्रांचे म्हणणे आहे.
कारागृहाच्या सुरक्षेला तडे!
By admin | Updated: June 16, 2014 01:16 IST