नागपूर : बसच्या योग्यता प्रमाणपत्र जारी करण्यासाठी ‘व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस’ (व्हीएलटी) सक्रिय असण्याची अट जाचक असून, अनेक स्कूल बसला योग्यता प्रमाणपत्र मिळणे कठीण झाले आहे, ही अट शिथिल करण्याच्या मागणीसाठी महानगर परवानाधारक बस असोसिएशनच्या वतीने सोमवारी आरटीओ नागपूर ग्रामीणच्या प्रवेशद्वाराजवळ बस उभ्या करून आंदोलन केले. प्रवेशद्वार बंद झाल्याने काही वेळेसाठी कार्यालयाचे कामकाज प्रभावित झाले होते.
असोसिएशनचे शैलेश पांडे यांनी सांगितले, २०१९ नंतरच्या सर्व वाहनांना २४ महिन्यांचे योग्यता प्रमाणपत्र दिले जाते. आता हे प्रमाणपत्र वाहनात ‘व्हीएलटी’ सक्रिय असेल तरच देण्यात यावे, असे आदेश परिवहन विभागाने काढले आहेत. मात्र, ‘व्हीएलटी’ची वैधता सहा महिने, १२ महिने किंवा दोन वर्षेसुद्धा असू शकते. परंतु योग्यता प्रमाणपत्राच्या नूतनीकरणाची तारीख व ‘व्हीएलटी’ संपण्याची तारीख एकाचवेळी येईलच, असे नाही. त्यामुळे ही अट बसचालकांसाठी अन्यायकारक आहे. त्यामुळे परिवहन विभागाने ही अट मागे घ्यावी, अशी मागणी आहे.
यासंदर्भातील एक निवेदन १२ जून रोजी प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांना देण्यात आले होते. त्यावेळी आरटीओच्या प्रवेशद्वारासमोर बस उभ्या करून आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता. परंतु १० दिवसांचा कालावधी होऊनही परिवहन विभागाने यावर निर्णय घेतला नाही. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले. जवळपास १०० बसेस प्रवेशद्वाराजवळ उभ्या करण्यात आल्या होत्या. सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत हे आंदोलन चालले. त्यानंतर प्रादेशिक परिवहन अधिकारी चव्हाण यांनी मागणीला घेऊन सकारात्मकता दाखविल्याने तूर्तास हे आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात वीरेंद्र दुबे, धनराज बनसोड, ब्रिजेश मिश्रा, रफीकभाई, माधव खोपडे यांच्यासह मोठ्या संख्येत स्कूल बसचालक सहभागी झाले होते.