यवतमाळ : राज्य सरकारच्या कारभारात सुसूत्रता नसल्याने महाराष्टÑ राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक दरवर्षी कोलमडू लागले आहे. वारंवार परीक्षांच्या पुढच्या तारखा द्याव्या लागत असल्याने राज्यातील हजारो उमेदवारांना फटका बसतो आहे. परिणामी उमेदवारांमध्ये सरकारऐवजी एमपीएससीच्या विरोधातच रोष निर्माण झाला आहे. राज्य लोकसेवा आयोगाकडून दरवर्षी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले जाते. सरकारच्या मागणीनुसार अधिकार्यांची पदे भरली जातात. परंतु कित्येकदा ऐनवेळी शासनाकडून किती जागा भरायच्या याची मागणीच नोंदविली जात नाही. आरक्षण, बिंदू, संख्या अशा विविध कारणांवरून अनेकदा पदभरतीला विलंब होतो. मात्र त्याचा फटका शासनाला न बसता एमपीएससीला बसतो. त्यांना परीक्षांचे वेळापत्रक पुढे ढकलावे लागते. त्याचा रोष मात्र एमपीएससीला सहन करावा लागतो. शासनस्तरावर कोणत्या कॅडरची किती पदे भरायची हेच अखेरपर्यंत निश्चित होत नसल्याने हा गोंधळ वाढतो. एमपीएससीचा व्याप दिवसेंदिवस वाढतो आहे. दरवर्षी १५ लाखांवर उमेदवार स्पर्धा परीक्षा देतात. या संपूर्ण परीक्षा पारदर्शक व्हाव्या म्हणून आॅनलाईन पद्धतीवर भर दिला जात आहे. कागदाची बचत, तत्काळ निकाल आणि गैरप्रकाराला वाव नसणे ही या पद्धतीची वैशिष्ट्ये आहेत. सध्या पाच ते दहा हजार उमेदवार असलेल्या परीक्षा आॅनलाईन पद्धतीने घेतल्या जातात. मात्र आता सर्वच कॅडरकडून आॅब्जेक्टीव्ह पद्धतीने आॅनलाईन परीक्षांसाठी दबाव वाढतो आहे. महाराष्टÑात एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात संगणक उपलब्ध होणे आणि त्यांना एमपीएससीची लिंक जोडणे शक्य नसल्याचे विश्वसनीय सूत्राने सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)
राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक कोलमडतेयं
By admin | Updated: May 27, 2014 01:51 IST