नागपूर : सरपंच पदाकरिता ११ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. याच दिवसापासून ग्रामपंचायतीचा कार्यकाळ सुरू होणार आहे.
कोरोनामुळे राज्य सरकारने निवडणुकी पुढे ढकलल्या. त्यामुळे कार्यकाळ संपुष्टात आलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात आले होते. डिसेंबर महिन्यात या ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. नागपूर जिल्ह्यात १३० ग्रामपंचायतींकरिता निवडणूक घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले. एका ग्रामपंचायतमधील उमेदवाराचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील १२९ ग्रामपंचायतींकरिता निवडणूक प्रक्रिया पार पडली. १५ जानेवारीला मतदान व १८ जानेवारीला मतमोजणी झाली. नागपूर जिल्ह्यात ७४.८९ टक्के मतदान झाले. ४ फेब्रुवारीपर्यंत सरपंच आरक्षणाची प्रक्रिया सर्व तालुक्यात पूर्ण करायची होती. मिळालेल्या माहितीनुसार काटोल, नरखेड, रामटेक, पराशिवनी, नागपूर ग्रामीण, हिंगणा, भिवापूर, उमरेड, मौदा, कुही, सावनेर तालुक्यात सरपंच पदाकरिता आरक्षणची प्रक्रिया ४ तारखेपूर्वीच पूर्ण झाली. तर कामठी व कळमेश्वर तालुक्यात सरपंच पदाच्या आरक्षणाची प्रक्रिया गुरुवारी पार पडली. काही ग्रामपंचायतींमध्ये आरक्षण मागीलप्रमाणेच कायम आहे, तर काही ठिकाणच्या आरक्षणात बदल झाल्याचे सांगितले जाते.