नागपूर: सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नागपूर विभागात लिपिक पातळीवरील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होऊन दोन आठवड्याचा कालावधी झाला असला तरी अद्यापही कर्मचाऱ्यांना ‘रिलीव्ह’ केले नसल्याने बदल्या केवळ कागदोपत्रीच ठरल्या आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची नाराजी आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नागपूर विभागातील विविध उपविभागातील लिपिक व तत्सम दर्जाच्या कर्मचाऱ्यांच्या दोन आठवड्यापूर्वी बदल्या करण्यात आल्या. पूर्व विभागातील सहा जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश आहे. बदल्या झाल्यावर कर्मचाऱ्यांना रिलीव्ह करणे अपेक्षित असते.मात्र नागपुरातील उपविभाग, एक, दोन आणि तीनमध्ये याउलट चित्र आहे. बदलीचे आदेश प्राप्त होऊन दोन आठवड्यापेक्षा अधिक काळ झाला तरी कर्मचाऱ्यांना रिलीव्ह करण्यात आले नाही. वरिष्ठांना याबाबत विचारणा केल्यावर कर्मचारी मिळाल्यावरच तुम्हाला रिलीव्ह केले जाईल असे सांगण्यात येते. कर्मचाऱ्यांना रिलीव्ह न करणे व मर्जीतील कर्मचाऱ्याची बदली झाल्यावर त्याला त्याच ठिकाणी ठेवणे यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण होत असल्याची माहिती हाती आली आहे.या संदर्भात अधीक्षक अभियंता व्ही.आर बनगीरवार यांच्या कानावर ही बाब टाकण्यात आली होती. मात्र त्यांनी असा काही प्रकार होत असल्याचा इन्कार केला होता. तसे होत असेल तर कर्मचाऱ्यांनी थेट संपर्क साधावा असेही त्यांनी सांगितले होते. कर्मचाऱ्यांना बदलीचे आदेशच प्राप्त होण्यास विलंब होतो. त्यातून काही वेळा रुजू करून घेण्यास किंवा रिलीव्ह करण्यास विलंब होतो, असे त्यांनी स्पष्ट ्केले होते. या नंतर एक आठवड्याचा कालावधी लोटला. सर्व कर्मचाऱ्यांना विशेषत: उपविभागातील कर्मचाऱ्यांना बदलीचे आदेश प्राप्त होऊन दोन आठवडे झाले तरीही कर्मचाऱ्यांना अद्यापही रिलीव्ह करण्यात आले नाही. वरिष्ठ अधिकारी त्यांच्याच मर्जीने याबाबत निर्णय घेत असल्याने त्याचा फटका कर्मचाऱ्यांना बसला आहे. दर वेळी असाच प्रकार केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. फक्त कागदोपत्री बदल्या दाखवून कर्मचाऱ्यांना त्याच ठिकाणी ठेवण्याचा प्रकार अनाकलनीय असून याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)
सा.बा. खात्यातील बदल्या कागदावर
By admin | Updated: June 20, 2014 00:55 IST