लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नशामुक्त भारत अभियान केंद्र शासनाने जोरकसपणे राबवावयाचे ठरविले आहे. यासाठी २७२ जिल्हे देशातून निवडण्यात आले आहेत. यामध्ये नागपूरसह मुंबई, पूणे, नाशिक यांचा समावेश आहे. जिल्ह्यात शहरासह, तालुके तसेच ग्रामीण भागात व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करण्यात येत आहे. नशामुक्त भारत अभियानात प्रशिक्षित स्वयंसेवकाची भूमिका फार महत्त्वाची आहे. कुठलीही गोष्ट समाज सहसा स्वीकारत नाही तोपर्यंत ती साध्य होत नाही. त्यासाठी जोमाने काम करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी उद्घाटनीय कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना केले.
केंद्र शासनाच्या समाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या वतीने नशामुक्त भारत अभियान राबविण्यात येत आहे. त्यानिमित्ताने आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड, बार्टीचे संचालक दिवाकर गमे, एनआयएसडीच्या राज्य समन्वयक प्रज्ञा खोब्रागडे, सहायक आयुक्त सामाज कल्याण बाबासाहेब देशमुख व मधुर एकात्मिक व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्राचे संचालक प्रा. डॉ. विनोद गजघाटे यावेळी उपस्थित होते.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक भोनेश्वर शिवनकर यांनी, तर दुसऱ्या सत्रात एनआयएसडीच्या राज्य समन्वयक प्रज्ञा खोब्रागडे यांनी मार्गदर्शन केले.