लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पेट्रोल आणि डिझेलची किंमत दरदिवशी वाढत असून त्यामुळे सर्वसामान्य आणि वाहतूकदार त्रस्त आहेत. डिझेलच्या उच्चांक किमतीमुळे वाहतूकदारांचे ट्रक जागेवरच उभे आहेत. त्यामुळे बँकांचे हप्ते थकीत असून विमा, आरटीओ कर आणि टोल भरण्यासाठी वाहतूकदारांकडे पैसे नाहीत. ट्रक जप्त करण्यासाठी बँकांच्या नोटिसा येत असून वाहतूकदार चिंतेत आहेत. इंधन दरवाढीमुळे वाहतूक व्यवसायाला घरघर लागली आहे.
ट्रकर्स युनिटीचे अध्यक्ष कुक्कू मारवाह म्हणाले, कोरोना लॉकडाऊनमुळे उद्योग-व्यावसायिकांवर संकट आले आहे. त्यामुळे मालाची ये-जा बंद झाली आहे. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट युनियनच्या नेतृत्वात संपूर्ण देशात वाहतूकदार संघटना इंधन दरवाढीच्या विरोधात आंदोलन करणार आहेत. सरकारने आंदोलनाची दखल न घेतल्यास देशातील वाहतूकदार आपले ट्रक भररस्त्यात उभे करतील. संघटनेने केरोसिन तेलाची सबसिडी रद्द करण्याची मागणी केली आहे. केरोसिन तेलाचा काळाबाजार होत असून ५० ते ६० रुपये लिटर दराने विक्री होत आहे. इंधन जीएसटीअंतर्गत आणण्याची संघटनेची मागणी आहे. पण सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. कररूपी नफा कमविण्यासाठी सरकार दरदिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवीत आहे. हा सामान्य आणि वाहतूकदारांवर आघात आहे. सर्वांना संकटाच्या खाईत लोटत असल्याचा आरोप मारवाह यांनी केला.
ट्रकच्या किमती अतोनात वाढल्या आहेत. प्रत्येक वाहतूकदाराला एक ते सव्वा लाख रुपये बँकेचा हप्ता भरावा लागत आहे. पण ट्रक जागेवरच उभे असल्याने हप्ते भरणे कठीण झाले आहे. मंत्र्यांनी सांगितल्यानुसार ट्रक सीएनजीवर चालविणे कठीण आहे. देशात सीएनजीचे पुरेसे डेपो नाहीत. आठ महिन्यात डिझेल प्रति लिटर २० रुपयांनी वाढले आहेत. ही दरवाढ दरदिवशी सुरूच आहे. अशी स्थिती पुन्हा काही दिवस सुरू राहिल्यास वाहतूकदारही शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्या करतील, असे त्यांनी सांगितले.
जनतेने रस्त्यावर उतरावे
इंधन दरवाढीवर आंदोलन करताना जनतेला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. वाहतूकदारही त्यांच्यासोबत रस्त्यावर येईल आणि सरकारच्या निर्णयाचा विरोध करतील. सरकारने थोडे कर कमी केल्यास इंधनाच्या किमती कमी होऊन सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.