आनंद डेकाटे, नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रातील प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) टप्पा क्रमांक २.० या योजनेतील तांत्रिक अडचणी दूर करीत योजनेच्या ऑनलाइन नोंदणीला अधिक गती देण्याची गरज आहे. यासाठी प्रशासनाला लोकप्रतिनिधींनी सहकार्य करण्याचे आवाहन महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी येथे केले.
नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात एनएमआरडीए क्षेत्रातील सरपंच व ग्रामसेवकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) टप्पा क्रमांक २.० या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, नासुप्र सभापती तथा एनएमआरडीए आयुक्त संजय मीणा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, एनएमआरडीए क्षेत्रातील सरपंच, ग्रामसेवक प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) टप्पा क्रमांक २.० ही सर्वसामान्यांसाठी योजना शासनाने आणली आहे. त्यामुळे या योजनेची नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यात याव्यात. यासाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रशासन, सरपंच व ग्रामसेवकांच्या सहकार्याने नाव नोंदणीस गती देण्याचे आवाहन पालकमंत्री बावनकुळे यांनी यावेळी केले. प्रास्ताविक नासुप्र सभापती तथा एनएमआरडीए आयुक्त संजय मीणा यांनी केले.उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरवजिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नऊ ग्रामपंचायतींचा गौरव पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला. यात मौदा तालुक्यातील वाकेश्वर, कोदामेंढी, सिरसोली, कामठी तालुक्यातील महालगाव, उमरी, उमरेड तालुक्यातील सुरगाव कुही तालुक्यातील तितुर, सावनेर तालुक्यातील पिपळा डा. ब. तसेच पारशिवनी तालुक्यातील उमरी पाली या ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि सचिवांना पालकमंत्र्याच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.