नागपूर: प्रवाशांसाठी अधिकाधिक चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे दावे रेल्वे प्रशासनाकडून केले जाते. पुष्टीदाखल जागोजागी सुरू असलेल्या शेकडो कोटींच्या विकास कामांचा हवाला दिला जातो. तो काही अंशी खरा असला तरी वेळोवेळी कोलमडणारे रेल्वेचे वेळापत्रक रेल्वे प्रवाशांना त्रस्त करणारे ठरले आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांकडून रागाच्या भरात तिकिटच कॅन्सल करण्याचा पवित्रा घेतला जात आहे. गेल्या २५ महिन्यांच्या कालावधीत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील प्रवाशांनी ६० कोटी रुपयांची तिकिटे कॅन्सल केल्याची माहिती पुढे आली आहे.
अमृत भारत स्टेशन योजनेसह रेल्वेच्या नेटवर्कला देशभरात प्रशस्त करण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. त्यानुषंगाने जागोजागी हजारो कोटी रुपये खर्च करून रेल्वेच्या नवीन लाईन्स (थर्ड लाईन, फोर्थ लाईन), पुलांची, बोगद्यांची उभारणी केली जात आहे. सिग्नल सिस्टम, रेल्वे स्थानकांचा मेकओव्हर केला जात आहे. नागपूरसह अनेक ठिकाणच्या रेल्वे स्थानकांना वर्ल्ड क्लास लूक देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रशस्त पार्किंगसह गुळगुळीत रस्ते, आकर्षक प्रवेशद्वार, प्रकाश व्यवस्था, स्वयंचलित तिकिट मशिन्स, प्रवाशांसाठी आरामदायक आसने, प्रतिक्षालये निर्माण केली जात आहे. हे सर्व दिलासादायक असले तरी रेल्वेच्या वारंवार कोलमडणाऱ्या वेळापत्रकाने त्यावर मात केली आहे.
कोणती गाडी कधी रद्द केली जाईल किंवा लेट होईल, याचा भरवसाच नाही. अनेकदा गाड्या परावर्तीत मार्गाने चालविल्या जातात. हे करताना प्रवाशांचा विचारच होत नाही. अनेक दिवसांपूर्वी प्रवासाचे बेत ठरवून कन्फर्म तिकिटे काढणाऱ्या प्रवाशांना यामुळे प्रचंड मनस्ताप होतो. ऐनवेळी दुसऱ्या मार्गाचा पर्याय आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसतो. त्यामुळे हिरमोड झालेले प्रवासी प्रवासाचा बेतच रद्द करतात. त्यामुळे काढलेले तिकिट रद्द करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायच नसतो. अशा प्रकारे गेल्या २५ महिन्यात मध्य रेल्वेच्या एकट्या नागपूर विभागात ५९ कोटी, ८१ लाखांची तिकिटे रद्द झाल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे.महिनाभरात २.६४ कोटीवर्ष २०२३-२४ मध्ये २७ कोटी, ५३ लाख, वर्ष २०२४-२५ मध्ये २९ कोटी, ६४ लाख रुपयांची तिकिटे प्रवाशांनी रद्द केली. तर, एप्रिल २०२५ या एका महिन्यात रद्द झालेल्या तिकिटांची किंमत २ कोटी, ६४ लाख रुपये एवढी आहे.