नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमधील कोरोना स्थिती हाताळण्यासाठी मेहनत घेतली आहे. नागपूरमध्ये रेमडेसिविर औषधांचा पुरवठा, ऑक्सिजनची सुविधा, रुग्णांसाठी खाटा उपलब्ध करणे अशा प्रत्येक पातळीवर गडकरी व फडणवीस हे जातीने लक्ष देऊन कामे करत आहेत. त्यामुळे त्यांनी नागपूरमध्ये कोरोना रुग्णांसाठी काय केले, हा प्रश्न दर पावसाळ्यात पक्ष बदलणारे काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोढेंनी विचारणे हास्यास्पद आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे माध्यम प्रमुख विश्वास पाठक यांनी शुक्रवारी केली.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत पाठक म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये सुरुवातीला विदर्भातील परिस्थिती भयावह होती. मात्र, गडकरी, फडणवीस हे जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहिले. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली नाही. गडकरी यांच्या मदतीमुळे विदर्भामध्ये ११ हजार ४०० रेमडेसिविर औषधांचा पुरवठा करता आला. गडकरी यांनी या औषधाच्या उत्पादनासाठी नवीन प्रकल्पांना केंद्राकडून मंजुरी मिळवून दिली आहे. तसेच एक हजार पोर्टेबल ऑक्सिजनची सुविधा व एक हजार व्हेटिंलेटरची सुविधासुद्धा त्यांनी उपलब्ध करून दिली.
फडणवीस हे स्वत: नागपूरमध्ये थांबून तेथील परिस्थिती हाताळत आहेत. राज्यात रेमडेसिविर औषधे उपलब्ध व्हावीत यासाठी ते नियमित केंद्राशी समन्वय साधत आहेत. त्यांच्या पुढाकारातून नागपूर येथे गुरुवारी एनसीआय येथे १०० खाटांचे रुग्णालय सुरू करण्यात आले. लोंढे यांनी आरोप करण्याआधी संपूर्ण माहिती व अभ्यास करणे गरजेचे आहे. दर पावसाळ्यात पक्ष बदलणाऱ्या नेत्यांना स्वत:च्या स्वार्थापुढे विकासाची कामे दिसत नाहीत, अशी टीकाही पाठक यांनी केली आहे.