नरेश डोंगरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तब्बल चार महिने राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची उत्कंठा ताणून धरल्यानंतर सरकारने अधीक्षक आणि उपायुक्त दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीची पहिली यादी तीन दिवसांपूर्वी जाहीर केली. मात्र, या यादीत बदलीचे कोणते निकष सरकारने लावले ते संबंधितांना कळेनासे झाल्याने बदलीची ही यादी पोलीस अधिकाऱ्यांसाठी रोषाचा विषय ठरली आहे. त्यामुळे ‘बदली’नंतर आता ‘बदल’ करून घेण्यासाठी संबंधितांनी फिल्डिंग टाईट केली आहे.
गेल्या वर्षी अधिकाऱ्यांच्या बदलीपूर्व प्रक्रियेला लाखोंची लेण-देण, रेकॉर्डिंग आणि आरोप-प्रत्यारोपाची पार्श्वभूमी लाभली. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा विषय राज्य सरकारसाठी विस्तवासारखा ठरला होता. त्यात अनेक वादग्रस्त अधिकाऱ्यांनी आपल्या गॉडफादर्सकडून फिल्डिंग टाईट केल्याने एसपी, डीसीपी आणि त्याउपरच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नाव आणि स्थळांचा मेळच जमत नव्हता. त्यामुळे बदलीची यादी जाहीर करण्याऐवजी ‘तारीख पे तारीख’चा लपंडाव सुरू होता. परिणामी मे, जून, जुलै आणि ऑगस्ट अशा सलग चार महिन्यांपासून बदलीच्या प्रतीक्षेत असलेले अधिकारी अक्षरश: वैतागले होते. दरम्यानच्या कालावधीत क्राईम पोस्ट समजल्या जाणाऱ्या ठिकाणांवर वर्णी लावून घेण्यासाठी अनेकांनी आपले घोडे दामटल्याने पुन्हा ‘पेटी, खोक्याची’ही चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर ३१ एसपी, डीसीपी आणि त्या पदाखालच्या अधिकाऱ्यांची यादी ९ सप्टेंबरला सरकारने जाहीर केली. मात्र, या यादीने अनेकांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या रोषात आणखीच भर पडली आहे. काही नावे वगळता कोणत्या निकषाआधारे या बदल्या केल्या, तेच संबंधितांना कळेनासे झाले आहे. गणेशोत्सव बंदोबस्त आटोपल्यानंतर अर्थात १९ सप्टेंबरनंतर उर्वरित अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी जाहीर करण्याचे सांगून उफाळू पाहणारा रोष दाबण्याचे तंत्र अवलंबिण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
---
साईडलाईन ते साईडलाईन
सध्या जे अधिकारी साईडलाईन आहे, त्यांना एक्झ्युकेटिव्ह आणि जे एक्झ्युकेटिव्ह पोस्टवर आहेत त्यांना थोडी साईडलाईन पोस्ट दिली जाणार, अशी चर्चा होती. जे वादग्रस्त आहेत, त्यांना पुरतेच बाजूला ठेवून फ्रेशर्सना काम करण्याची चांगली संधी दिली जाईल, अशी अपेक्षा वजा चर्चा होती. मात्र, या बदलीच्या यादीतून तसे काहीही झळकलेले नाही. दोन वर्षे कार्यकाळ पूर्ण झालेल्यांची बदली, हा एकमात्र निकष लावण्यात आल्याचे या घडामोडीच्या संबंधाने सांगितले जात असले तरी त्यातही तथ्य नसल्याचे अनेक अधिकाऱ्यांच्या ‘हेल्डिंग’वरून दिसून येते. प्रचंड वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या काही अधिकाऱ्यांना क्राईम पोस्ट देऊन सरकारने चांगल्या अधिकाऱ्यांवर अन्याय केल्याचीही भावना आहे.
----
‘ते’ पुन्हा मागे पडणार ?
गेल्या वेळी २०१४-१५ च्या बॅचमधील काही अधिकाऱ्यांना एसपी म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. जागा कमी पडल्याने महाराष्ट्रातील ५ अधिकारी मागे पडले होते. या पाचमध्ये नागपुरातील निलोत्पल, लोहित मतानी आणि डॉ. अक्षय शिंदे यांचा समावेश होता. या पाच अधिकाऱ्यांना सर्वप्रथम पोलीस अधीक्षक म्हणून संधी मिळेल, असा दावा वजा विश्वास पोलीस दलातून व्यक्त होत होता. मात्र, निलोत्पल यांची डीसीपी मुंबई म्हणून बदली झाली आहे. नक्षल्यांच्या गुहेत शिरून काम करणाऱ्यांना कर्तव्यपूर्तीनंतरचा पुरस्कार म्हणून मनासारखी पोस्ट मिळते. मात्र, यावेळी तसे काहीच झालेले नाही.
---
१९ सप्टेंबरनंतर फुटणार पोळा
देशातील सुमारे ९५ अधिकारी सध्या हैदराबादला आयपीएस अकादमीत ट्रेनिंग घेत आहेत. त्यात महाराष्ट्रातील १२ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यात बदली झालेल्यांपैकी अधीक्षक विजयकुमार मगर यांच्यासह चाैघांचा समावेश आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हे ट्रेनिंग कॅम्प पूर्ण होणार असून, तिकडून आल्यानंतर ते अधिकारी संबंधित ठिकाणी रुजू होणार आहेत. तत्पूर्वी गणपती बंदोबस्त १९ सप्टेंबरला संपेल आणि नंतर आक्रमकपणे हा विषय मार्गी लावला जाणार असल्याची खास सूत्रांची माहिती आहे.
----