लोकमत न्यूज नेटवर्ककेळवद : मध्य प्रदेशातील पांढुर्याहून नागपूरकडे वेगात जाणाऱ्या ट्रकने रोड ओलांडणाऱ्या गुरांच्या कळपातील १५ गाईना चिरडल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. शिवाय, ट्रकच्या धडकेमुळे १३ गाईना गंभीर दुखापत झाली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्ता रोको केल्याने या मार्गावरील वाहतूक किमान दोन तास ठप्प होती. ही घटना केळवद (ता. सावनेर) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सावनेर-पांढुर्णा महामार्गावरील छत्रापूर फाटा परिसरात शुक्रवारी (दि. २७) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.
घनश्याम शेंद्रे (५०, रा. छत्रापूर, ता. सावनेर) हा गुराखी असून, तो गावातील शेतकऱ्यांकडे असलेल्या गाई त म्हशी याच गावाच्या शिवारात रोज चारायला नेतो व सायंकाळी घरी परत आणतो. तो रोज गावातील किमान १५० गाई चारायला नेतो. नेहमीप्रमाणे तो गाईचा कळप घेऊन गावापासून दीड कि.मी.वर असलेल्या नागपूर-सावनेर-पांढुर्णा-भोपाळ मार्गालगत घेऊन गेला होता. काही जनावरे रोडलगत चारा खात होती. काही रोड ओलांडून पलीकडे जात होती.
दरम्यान, पांढुर्णाहून नागपूरकडे वेगात जाणाऱ्या आरजे-३९/जीए-३१८९ क्रमांकाच्या ट्रकने रोड ओलांडणाऱ्या गुरांना जोरात धडक दिली आणि ट्रक निघून गेला. या ट्रकच्या धडकेमुळे कळपातील १५ गाईचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर १३ गाई गंभीर जखमी झाल्या. अपघाताची माहिती मिळताच सहायक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल म्हस्के, केळवदचे ठाणेदार अनिल राऊत व पोलिस कर्मचारी तसेच आंदोलनाची माहिती मिळताच आमदार डॉ. आशिष देशमुख, मनोहर कुंभारे, डॉ. राजीव पोतदार घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी गुरांच्या मालकांसह नागरिकांशी चर्चा करून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करीत मागण्या मान्य करण्याची ग्वाही दिली. पंचनाम्यानंतर मृत गुरांची विल्हेवाट लावण्यात आली; तर जखमी गुरांना सावनेर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेण्याची व्यवस्थाही पोलिसांनी केली.
आंदोलनात मृत व जखमी जनावरांचे मालक बाबा बोबडे, नीळकंठ जोगी, दिवाकर शेंद्रे, श्रावण बोबडे, वासुदेव वाडी, देवमान कोल्हे, पुष्पक वाडी, होमराज उकीणकर, बंडू वाडी, ज्ञानेश्वर कोल्हे, हेमराज शेंद्रे, तेजराम शेंद्रे, धनुराज बोबडे, नरेंद्र बोबडे, नरेंद्र बोबडे, बोबडे यांच्या ढोके, राहुल बोबडे, वसंता बोबडे, मंदाबाई बोबडे, वंदना शेंद्रे, ममता रामटेके, छाया जोगी, तुळसा ढोके व नागरिक सहभागी झाले होते. या प्रकरणी केळवद पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलिस उपनिरीक्षक अरुण राठोड तपास करीत आहेत.
पाठलाग करून पकडला ट्रकगुरांना धडक दिल्यानंतर चालकाने ट्रकचा वेग वाढवून पळ काढला. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलिस विभागाचे सुरेश निंबाळकर, गाडगे, ढोके यांनी त्यांच्या वाहनाने या ट्रकचा पाठलाग केला आणि पाटणसावंगी (ता. सावनेर) गावाजवळील टोलनाक्यावर हा ट्रक अडवला. शिवाय, ट्रकचालक काना मोतीराम (२९, रा. झिरो वॉटर पॉइंट, सिदनहरी, जिल्हा बारमेर, राजस्थान) याला ताब्यात घेत अटक करून ट्रक जप्त केला.
संतप्त नागरिकांचा 'रास्ता रोको'
- माहिती मिळताच गुरांच्या मालकांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले होते. गुरांची अवस्था पाहून नागरिक संतप्त झाले आणि त्यांनी लगेच 'रास्ता रोको' करायला सुरुवात केली.
- मालकांना मृत व जखमी गुरांची नुकसानभरपाई मिळावी तसेच घटनास्थळी वारंवार अपघात होत असल्याने या ठिकाणी ओव्हरब्रिज बांधण्याची मागणी त्यांनी रेटून धरली होती.
- या दोन्ही मागण्यांबाबत सकारात्मक आश्वासन मिळाल्याने आंदोलन थांबविण्यात आले. रास्ता रोकोमुळे या मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती.