योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी यांनी नागपूरच्या धापेवाडा येथे ८०० ग्रॅम ते १ किलो वजनाच्या कांद्याचे उत्पादन केले आहे. गडकरी यांनी स्वत: सोशल माध्यमांतून ही माहिती दिली आहे.
धापेवाडा येथील भक्ती फार्म येथे हा प्रयोग करण्यात आला. गडकरी यांनीच बियाणे, वापरलेले तंत्रज्ञान याबाबत व्हिडीओच्या माध्यमातून माहिती दिली. बियाणे नेदरलँड्समधून आणले गेले होते. २.५ किलो बियाणे एक एकर जमिनीत पेरण्यात आले. तेथे ४५ दिवसांसाठी रोपवाटिका तयार करण्यात आली. त्यानंतर, वाढलेली रोपे दुसऱ्या ठिकाणी लावण्यात आली. दुहेरी ठिबक सिंचन करण्यात आल्यावर त्या मातीत सेंद्रिय खत मिसळण्यात आले. त्यानंतर, तेथे मल्चिंग पेपर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. यात २५ मायक्रॉन प्लास्टिक फिल्मचा समावेश असतो. त्यात छिद्रे पाडून सुमारे २४ हजार रोपे लावण्यात आली. या तंत्रज्ञानामुळे जमिनीचा ओलावा कायम राहतो. तसेच जमिनीचे तापमान संतुलित राहते. उत्पादित झालेल्या एका कांद्याचे सरासरी वजन ४०० ग्रॅम ते ८००-१००० ग्रॅम आहे. एका एकरातून १२ ते १३ टन उत्पादन घेतले आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली. जर कोणत्याही शेतकऱ्याला अशा प्रकारे सेंद्रिय शेती करायची असेल तर आम्ही त्याला पूर्ण मदत करू, असा दावा नितीन गडकरी यांच्या कार्यालयाकडून करण्यात आला आहे.खरीप हंगामात महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तथापि, कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली तर कांद्याचे उत्पादन कमी होते, ज्यामुळे देशात कांद्याची टंचाई निर्माण होते आणि भाव वाढतात. नाशिक, पुणे आणि सोलापूर पट्ट्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन होते.