लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागासवर्गीयांच्या समस्या आणि अडचणी समजून घेऊन त्यांच्या विकासाला प्राथमिकता देण्याची गरज आहे. यासाठी सर्वांना एका मंचावर आणणे हे महत्वाचे असल्याचे मत रिपब्लिकन आघाडी कार्यकर्ता संमेलनात व्यक्त झाले. टेका सिद्धार्थ नगर येथील राजाभाऊ खोब्रागड़े सभागृहात ‘रिपब्लिकन भारताच्या निर्मितीसाठी रिपब्लिकन जनतेचे एकसंघ आंदोलन’ या विषयावर झालेल्या मेळाव्यात ही भावना व्यक्त करण्यात आली.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन विचारवंत विनायक जामगडे होते. ते म्हणाले, मागील काही वर्षांपासून संविधानात असलेल्या मागासवर्गियांच्या तरतुदी संपविण्याचा प्रयत्न होत आहे. देश संविधानाच्या माध्यमातूनच चालणार आहे. त्यामुळेच संविधनाच्या रक्षणासाठी सर्वांची एकजूट आवश्यक आहे. हे होण्यासाठी रिपब्लिकन विचाराच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन समाजाची शक्ती वाढवायला हवी.
यावेळी आघाडीचे संजय पाटील यांनीही सर्वांना एकत्र येण्याचे आणि संघटनात्मक शक्ती वाढविण्याचे आवाहन केले. छाया खोब्रागडे, मेघराज काटकर, विजय बागुल, भूपेश थुलकर, जावेद अन्सारी पाशा, प्रवीण खोब्रागडे, सागर डबरासे, असलम खान मुल्ला, राहुल प्रधान, देशक खोब्रागडे, सिद्धार्थ पाटील, राहुल मून आदींसह अनेकांनी सहभाग घेतला.