२०० किमीचे अंतर वाचविणारा राष्ट्रीय महामार्गही वन कायद्याच्या कचाट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 10:36 AM2021-07-09T10:36:08+5:302021-07-09T10:39:06+5:30

Nagpur News महाराष्ट्राच्या नक्षलग्रस्त भामरागड ते नारायणपूर (छत्तीसगड) चे अंतर २०० किलोमीटरने घटणार आहे.

The National Highway, which saves a distance of 200 km, is also in conflict with the Forest Act | २०० किमीचे अंतर वाचविणारा राष्ट्रीय महामार्गही वन कायद्याच्या कचाट्यात

२०० किमीचे अंतर वाचविणारा राष्ट्रीय महामार्गही वन कायद्याच्या कचाट्यात

Next
ठळक मुद्दे भारतमाला प्रकल्पाचा भाग असूनही वेग मात्र कमीमहत्प्रयासाने हायवे बनतोय साडेपाच मीटरचाप्रकल्प पूर्ण झाल्यास महाराष्ट्र-छत्तीसगडचे अंतर ६० किमीने घटणार


फहीम खान

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : भारतमाला प्रकल्पांतर्गत देशात नव्या राष्ट्रीय महामार्गांचे बांधकाम वेगात सुरू आहे. मात्र याच प्रकल्पाचा भाग असलेल्या महाराष्ट्र आणि छत्तीसगडला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात केंद्रीय वन कायद्याच्या नावाखाली अडथळे सुरू आहेत. हा राष्ट्रीय महामार्ग तयार झाला, तर महाराष्ट्राच्या नक्षलग्रस्त भामरागड ते नारायणपूर (छत्तीसगड) चे अंतर २०० किलोमीटरने घटणार आहे. सध्या २६५ किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे, एवढेच नाही या दोन्ही राज्यांतील आदिवासी जनतेला दोन दिवसांचा पायी प्रवास करून भामरागडवरून नारायणपूरला पोहचावे लागत आहे. हा राष्ट्रीय महामार्ग तयार झाल्यास भामरागड ते नारायणपूरचे अंतर ६० किलोमीटरने घटणार आहे. याचा थेट परिणाम क्षेत्राच्या विकासावर होणार आहे. हा महामार्ग झाल्यास हेमलकसाचे नैसर्गिक सौंदर्य, वनवैभव, ग्लोरी ऑफ आलापल्ली पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्याही वेगाने वाढू शकते.

‘विदर्भच्या काश्मीर’पर्यंत पोहोचणे होईल सोपे

भामरागड तालुक्यातील बिनागुंडा हे गाव उंच पहाडावर आणि घनदाट जंगलात आहे. यामुळे येथील तापमान नेहमीच सामान्यापेक्षा कमी असते. येथील निसर्गसौंदर्य आणि थंड वातावरणामुळे याला विदर्भाचे काश्मीर म्हणतात. मात्र मार्ग नसल्याने येथे पोहोचणे सोपे नाही. महामार्ग झाला तरच हे शक्य आहे. हा महामार्ग छत्तीसगडमधील अबूझमाड क्षेत्रातून जाणार आहे.

चारपदरी मार्गासाठी परवानगी नाही

या प्रकल्पातील संपूर्ण मार्ग जंगलातून जात असल्याने केंद्रीय वन कायद्याचा अडथळा आहे. प्रस्तावाला परवानगी देण्यासाठी वनविभाग टाळाटाळ करीत आहे. आलापल्ली ते भामरागडदरम्यानचा मार्ग वनविभागाच्या परवानगीनंतरच झाला. तोसुद्धा फक्त ५.५ मीटर आहे. यातही ताडगाव ते हेमलकसादरम्यान रस्ता बांधकामासाठी वनविभागाने परवानगी न दिल्याने हा मार्ग फक्त ३.५ मीटरचाच करावा लागला. प्रकल्पानुसार हा फोरलेन मार्ग करायचा आहे, परवानगी मिळाली तरच हे शक्य आहे.

३३ किलोमीटरचा मार्ग बाकी

यात पुन्हा ३३ किलोमीटर मार्गाचे बांधकाम बाकी आहे. हा मार्ग घनदाट जंगलातून आणि पहाडांमधून निघणार आहे. या ३३ किलोमीटरपैकी २५ किलोमीटरचा मार्ग महाराष्ट्रात असून, उर्वरित ८ किमीचा मार्ग छत्तीसगड राज्याच्या क्षेत्रात आहे.

या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामासाठी आवश्यक सर्व्हे आमच्याकडून झाला आहे. वन विभागाच्या परवानगीसाठी पत्रव्यवहार सुरू आहे. दोन राज्यांना जोडणारा हा महामार्ग प्रकल्प लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास आहे.

- विवेक मिश्रा, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग, गडचिरोली

Web Title: The National Highway, which saves a distance of 200 km, is also in conflict with the Forest Act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.