लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आठवड्यापूर्वी मनपाच्या उपद्रव शोध पथकातील (एनडीएस) तीन जवानांवर हल्ला करणारे आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत. या प्रकरणात नंदनवन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. यामुळे एनडीएस जवानात भीतीचे वातावरण आहे. पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आरोपी कुमार बावनकर याचे राजकीय नेत्याशी जवळचे संबंध असल्याने कारवाई होत नसल्याची चर्चा आहे.
या प्रकरणाची माहिती अशी की, केडीके कॉलेजच्या टी-पॉईंट ते राजेंद्रनगर चौकदरम्यान ठेलेवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. संबंधितावर २५ फेब्रुवारीला नेहरूनगर झोनच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत अडथळा आणून कुमार बावनकर (४०) याने आपल्या साथीदारांच्या मदतीने पथकावर हल्ला केला. तीन जवान जखमी झाले. यात आर. प्रताप सिंह, संजय रेहपाडे व कैलास येनुरकर आदींचा समावेश आहे. आरोपीवर कारवाई होत नसल्याने एनडीएस प्रमुख वीरसेन तांबे यांनी आयुक्त व महापौर यांना पत्र लिहून आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली.
मिळालेल्या माहितीनुसार आरोपी परिसरात खुलेआम फिरत असून नागरिकांना धमकावत आहेत. यासंदर्भात वीरसेन तांबे यांना विचारण केली असता त्यांनी या प्रकरणात नंदनवन पोलिसात तक्रार दाखल केली. एनडीएसचे जवान माजी सैनिक असल्याचे सांगितले. यातील आरोपींना अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली.
...
आरोपीकडून घेतला जातो हप्ता
मिळालेल्या माहितीनुसार अतिक्रमण करण्याची मुभा देण्याच्या मोबदल्यात आरोपीकडून हप्ता घेतला जातो. त्यामुळे या परिसरात अतिक्रमण वाढले आहे. आरोपींना संरक्षण मिळत असल्याने नागरिकातही दहशत आहे. याला आळा घालण्याची गरज आहे.