लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अमेरिकेने भारतावर लावलेल्या अतिरिक्त टॅरिफसंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. जगातील काही देश सातासमुद्रापार आहेत. त्यांच्याशी आपला थेट संबंधदेखील येत नाही. मात्र जर भारत मोठा झाला तर आमचे काय होईल ही त्यांना भिती वाटते. जर भारत मोठा झाला तर आमचे स्थान कुठे असेल या विचारातून ते अस्वस्थ होतात. याच भितीतून टॅरिफ लावण्यात आले आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. ब्रह्मकुमारीजच्या जामठा येथील विश्व शांती सरोवरच्या सातव्या वार्षिकोत्सवादरम्यान ते शुक्रवारी बोलत होते.
आज वेगवेगळ्या ठिकाणी वाद दिसून येतात. अगदी व्यक्तीपासून ते राष्ट्रांपर्यंतच्या वादाचे मूळ कारण हे आम्हाला पाहिजे व मला पाहिजे ही विचारधारा आहे. जेव्हा सर्व आमचे भाऊ आणि बहीण आहेत हे भाव असतात तेव्हा कलह निर्माण होत नाही. परंतु इतर जगाला काय पाहिले याचा विचार न करता केवळ स्वार्थाचा विचार होतो व स्वकेंद्रित भूमिकेतून वाद निर्माण होतात. मात्र जर आपल्याच शत्रुत्व नसेल तर आपला कुणीही शत्रू नसतो हे समजून घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही काही केले तरच विषारी साप तुम्हाला दंश करतात. त्याला एका मर्यादेत अंतरावर ठेवले तर तो काहीच करणार नाही.
जर आपल्या मनात आत्मियतेची भावना असेल तर आपला कुणीच शत्रू नसतो. मी, माझे याच विचारातून जगातील इतके वाद वाढतात, असे सरसंघचालक म्हणाले.
व्यक्ती आणि देशांना त्यांचे खरे स्वरूप समजणार नाही तोपर्यंत त्यांना समस्यांना तोंड द्यावे लागेल. जर आपण करुणा, आत्मियता दाखविली आणि भितीवर मात केली तर कुणीच आपले शत्रू राहणार नाहीत. विचारांचा दृष्टीकोन मी वरून आपल्यावर बदलला तर अनेक समस्या दूर होतील. भारत जगाच्या समस्यांवर उपाय शोधण्यास व पुढे जाण्याचा मार्ग दाखविण्यास सक्षम आहे. भारत महान आहे आणि भारतीयांनीही ज्ञानयुक्त होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेदेखील ते म्हणाले. यावेळी ब्रह्मकुमारीजच्या माऊंट अबू येथील मुख्यालयाचे अतिरिक्त महासचिव डॉ.बीके मृत्यूंजय भाई, मुख्य प्रशासक राजयोगिनी संतोष दीदी, राजयोग शिक्षिका बीके उषा दीदी, आ.मोहन मते, आ.कृपाल तुमाने, महानगर संघचालक राजेश लोया प्रामुख्याने उपस्थित होते.