लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाकिस्तानमधील काही लोकांशी लिंक असल्याच्या टीपवरून दहशतवाद विरोधी पथकाने कामठी येथून दोघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली असून एटीएसच्या पथकाकडून त्यांची कसून चौकशी सूरु आहे.
एटीएसच्या नागपूर युनिटने शनिवारी पहाटे ही कारवाई केली. ताब्यातील दोन्ही लोक मागील बऱ्याच काळापासून कामठीत होते व ते सोशल माध्यमांवर सक्रिय होते. सोशल माध्यमांतून ते दोघे पाकिस्तानमधील काही लोकांच्या संपर्कात होते. त्याची गोपनीय माहिती एटीएसला मिळाली. त्यानंतर दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना चौकशीसाठी एटीएसच्या नागपूर कार्यालयात नेण्यात आले. ऑपरेशन सिंदूरच्या वेळी कपिल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक महिला कारगिलमधून एलओसी ओलांडून पाकिस्तानमध्ये गेली होती. ती महिला देखील सोशल माध्यमातूनच पाकिस्तानमधील व्यक्तींच्या संपर्कात आली होती. पाकिस्तानी रेंजर्सने तिला ताब्यात घेतले होते. त्यानंतर तिची सखोल चौकशी झाली होती. आता कामठीतील दोन्ही व्यक्ती नेमके कुठल्या कारणासाठी पाकिस्तानमध्ये संपर्कात होते याची एटीएसच्या अधिकाऱ्यांकडून कसून चौकशी सुरू आहे.