नागपूर : अज्ञान, पुरुषप्रधानता आणि धर्माने लादलेल्या अंधश्रद्धेच्या दुष्टचक्रातून बाहेर काढत शिक्षणाचे हत्यार देऊन देशातील महिलांच्या उद्धाराचे दीपस्तंभ झालेल्या सावित्रीमाई फुले यांची आज जयंती. क्रांतिपुरुष ज्याेतिराव यांच्या मार्गदर्शनात शिक्षण घेउन आद्यशिक्षिका हाेत सावित्रीमाईने तमाम स्त्रियांना ‘चूल आणि मूल’ या परंपरेच्या चाैकटीतून काढत नव्या क्षितिजापर्यंत नेले. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या बराेबरीने काम करीत आहेत, ते या दाम्पत्यामुळे. त्यासाठी मुलींना शिकवायला जाताना सामाजिक बहिष्कार सहन करावा लागला, प्रसंगी शेण व दगडधाेंड्यांचा मार सहन करीत अनंत यातना सनातनाकडून सहन कराव्या लागल्या. यातूनच स्त्री उद्धाराचा देदीप्यमान इतिहास निर्माण करणाऱ्या या माऊलीचा आज जन्मदिवस. यानिमित्त शहरात विविध सामाजिक, शैक्षणिक संस्था, संघटना व राजकीय पक्षांनी या क्रांतिज्याेतिला अभिवादन केले.
‘महाज्योती’तर्फे व्याख्यान व महिलांचा सत्कार ()
ओबीसी, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील घटकांसाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्याेती) च्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान आणि समाजातील कर्तृत्ववान महिलांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले. ‘महाज्योती’चे संचालक डॉ. बबनराव तायवाडे यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा वारसा ‘महाज्योती’च्या निमित्ताने शासन पुढे नेईल, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीपकुमार डांगे, अतुल लोंढे, सामाजिक कार्यकर्त्या वंदना वनकर, ॲड. रेखा बाराहाते, डॉ. अंजली साळवे, दीनानाथ वाघमारे, कार्यकारी अधिकारी अतुल वासनिक उपस्थित होते. यावेळी प्रदीपकुमार डांगे यांनी ‘महाज्योती’च्या माध्यमातून सुरू असलेल्या आणि प्रस्तावित उपक्रमांची माहिती दिली. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या छायाताई कुरुटकर, नीता इटनकर, रंजना सुरुजुसे यांना सन्मानित करण्यात आले. सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित निबंध स्पर्धेत सातार जिल्ह्यातून ज्योती साळुंखे प्रथम व निकिता राजाराम भगत द्वितीय तर वैभव रामचंद्र शिवतारे याने तृतीय स्थान मिळविले. संचालन दिव्या शहारे यांनी केले. महाज्योतीचे समन्वयक उमेश कोर्राम यांनी आभार मानले.
राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चातर्फे शुक्रवारी तलाव परिसरात कार्यक्रम आयाेजित करण्यात आले. यावेळी ओबीसी मुक्ती मोर्चाचे प्रदेश कार्याध्यक्ष ॲड. गिरीश दादीलवार, संयोजक भूषण दडवे, नगरसेविका वंदना भगत, महासचिव प्रभाकर भडके, ॲड. छाया यादव, राज्य अध्यक्ष गीता महाले, बापुसाहेब चरडे, ॲड. सूर्यकांत जायसवाल, प्रदेश काँग्रेसचे अल्पसंख्यांक महासचिव जॉन थॉमस प्रामुख्याने उपस्थित हाेते. सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांना भारतरत्न देण्यात यावे तसेच भिडेवाडा पहिली मुलींची शाळेस राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करून जीर्णोद्धार करावा, अशी मागणी करण्यात आली.