कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणे हे काँग्रेसचे दुर्दैव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:07 AM2021-01-18T04:07:29+5:302021-01-18T04:07:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यात शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न असताना ते दूर करण्याचे सोडून काँग्रेस कृषी कायद्याविरोधात आंदोलन करीत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यात शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न असताना ते दूर करण्याचे सोडून काँग्रेस कृषी कायद्याविरोधात आंदोलन करीत आहे. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, अशी प्रतिक्रिया माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी व्यक्त केली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनवर भेट घेतल्यानंतर ते रविवारी माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, पश्चिम आणि पूर्व विदर्भात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन ही पिके हातची गेली आहेत. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांची आणेवारी ५० टक्क्यावर जाईल, अशी अपेक्षा होती. परंतु अत्यल्प आणेवारी दाखवून राज्य सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. पूर परिस्थिती, बोंडअळी, कीड यासारख्या अनेक अडचणी असतानाही शेतकऱ्यांना कसलीही मदत न देता केंद्राने पारित केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करावे, हे आश्चर्यकारक आहे. पश्चिम विदर्भातील शेतीच्या नुकसानीबाबत अमरावतीच्या विभागीय आयुक्तांनी शासनाकडे अहवाल पाठविला आहे. मात्र त्यावर कसलीही मदतीची घोषणा झाली नाही. मदतीसाठी पात्र असतानाही सरकारने शेतकऱ्यांना अपात्र ठरवून डावलले. त्यामुळे विदर्भातील शेतकरी राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. राज्य सरकारने कोणतेही सिंचनाचे प्रकल्प पूर्ण केले नाही, त्यासाठी निधीही दिला नाही. शेतकऱ्यांची ही अवस्था माध्यमांनी मांडली आहे. तरीही मुख्यमंत्री, कृषिमंत्री ऐकत नाहीत. त्यामुळे राज्यपालांना भेटून या विषयावर चर्चा करावी लागली. राज्यपालांशी झालेल्या आपल्या भेटीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली. याकडे लक्ष घालावे अशी विनंती आपण निवेदनातून केल्याचे बोंडे यांनी सांगितले. यावेळी राजभवनवर राज्यपालांशी झालेल्या चर्चेदरम्यान भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, आनंदराव राऊत, ललित संदूरकर, संदीप सरोदे, कपिल आदमने आदी उपिस्थत होते.