शुभांगी काळमेघ नागपूर : नागपूरमधील शांतिनगर आणि कावडीपेठ मधील १८० कोटी रुपये खर्च करून बांधलेला पूल आता सुरक्षिततेच्या दृष्टीने वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. उद्घाटनानंतरच पुलाच्या बांधकामात काही तांत्रिक त्रुटी असल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये पुलावरून प्रवास करतांना भीतीचे वातावरण आहे आणि त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात स्थानिक भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आमदार खोपडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना यासंदर्भात पत्र लिहून या प्रकल्पाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. पुलाच्या बांधकामात झालेल्या त्रुटीमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, असे त्यांनी पात्रात म्हटले आहे. विशेषतः पुलावरील T-पॉइंट हा अपघातांसाठी संवेदनशील रस्ता ठरला असून, वेळेवर याकडे लक्ष न दिल्यास मोठे अपघात होण्याची शक्यता आहे.
या मागणीची दखल घेत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आमदार खोपडे यांनी १८० कोटी रुपयांच्या या प्रकल्पातील तांत्रिक दोष दूर करून नागरिकांच्या जीवाला धोका राहणार नाही अशे पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
या प्रकरणामुळे नागपूरमधील पायाभूत सुविधांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे, आणि भविष्यात अशा त्रुटी टाळण्यासाठी अधिक दक्षता घेण्याची आवश्यकता आहे.